
भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला होता. भारताच्या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. अशातच आता जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि हिजबुल मुजाहिदीन (एचएम) यांनी आपले कॅम्प खैबर पख्तूनख्वा (केपीके) प्रदेशात हलवण्यास सुरुवात केली. लष्कर-ए-तैयबा ही संघटनाही याच भागात एक नवीन प्रशिक्षण केंद्र बांधत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये हे कॅम्प तयार होणार असल्याचे समोर आले आहे. तसेच यासाठी पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तैयबा लोअर दिर येथील कुंबा मैदानात 4600 चौरस फूट जमिनीवर एक मोठा ट्रेनिंग कॅम्प बांधत आहे, याची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. याला मरकज जिहाद-ए-अक्सा असे नाव देण्यात आले आहे. हे ठिकाण अफगाणिस्ताच्या सीमेपासून फक्त 47 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या या कॅम्पच्या पहिल्या मजल्यावरील छताचे काम सुरू आहे. हा कॅम्प अलिकडेच बांधलेल्या जामिया अहले सुन्नत मशिदीच्या शेजारी बांधला जात आहे.
लष्करच्या या कॅम्पची जबाबदारी 2006 च्या हैदराबाद बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड नसर जावेदकडे देण्यात आली आहे. जिहादसाठी वैचारिक प्रशिक्षण मुहम्मद यासीन उर्फ बिलाल भाई देणार आहे. तसेच शस्त्रास्त्र प्रशिक्षण अनस उल्ला खानकडे सोपवण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने लष्करचा मरकज अहले हदीस फिदाईन कॅम्प नष्ट केला त्यामुळे आता हा नवा कॅम्प बांधला जात आहे.
या कॅम्पमध्य़े प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी आगामी काळात भारतात हल्ले करू शकतात ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. हा कॅम्प भारतापासून दूर आहे, मात्र भारतीय सैन्य या ठिकाणावर हल्ला करण्यास सक्षम आहे. हा कॅम्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्णपणे तयार होणार आहे. त्यानंतर हे ठिकाण नवीन दहशतवाद्यांच्या भरती आणि प्रशिक्षणाचे केंद्र बनेल. पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध लढत असल्याचा दावा करत आहे, मात्र अशा कॅम्पच्या माध्यमातून ते भारताविरोधातील कारवायांची तयारी करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.