सावधान… नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय होणार? 72 तासात आणखी एक बॅरिअर लेक फुटणार? ओव्हरफ्लो सुरू
नेपाळवर पुन्हा महापुराचे संकट घोंगावत आहे. चीनच्या सीमेजवळील एक बॅरिअर लेक येत्या 72 तासांत फुटण्याची शक्यता चिनी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. वाढत्या जलस्तरामुळे ग्लेशियर फुटण्याचा धोका निर्माण झाला असून, यामुळे नेपाळमध्ये पुन्हा एकदा मोठा जलप्रलय येऊ शकतो. यापूर्वीच झालेल्या भीषण पुरामुळे जीवित व वित्तहानी झाली असताना, नवीन धोक्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नेपाळमध्ये काल जलप्रलय झाल्यानंतर संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. हे संकट अजून संपलेलं नसतानाच नेपाळवर दुसरं संकट घोंघावत आहे. चीनच्या सीमेजवळचा एक बॅरिअर लेक येत्या 72 तासात कोसळू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा नेपाळमध्ये महाप्रलय होऊ शकतो, असा इशारा चीनच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. हा लेक चोचेन खोला आणि पुरेपू सांगपो नद्यांच्या संगमावर आहे. याच ठिकाणी महाप्रलयाला सुरुवात होणार असल्याने त्याकडे चीनचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
चीनची सरकारी ब्रॉडकास्ट सीसीटीव्ही रिपोर्टनुसार, बीजिंगच्या अधिकाऱ्यांनी हिमालयाच्या सीमेजवळच्या क्रॉसिंगजवळच्या वरच्या भागात एक बॅरिअर लेकशी संबंधित धोका मार्क केला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा ग्लेशियर तुटण्याची शक्यता असून तिथे बचाव कार्य करणं अत्यंत कठिण असल्याचं म्हटलं आहे. सरकारी मीडियानुसार, चीनच्या जलसंसाधन मंत्रालयाने, आपत्ती स्थळ आणि उत्तर पूर्वेकडील चोचेन खोला आणि पुरेपू त्सांगपो नद्यांच्या संगमावरील असलेल्या या लेकवर विशेष लक्ष केंद्रीत केलं असून त्याच्याशी संबंधित माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे. मोठी दुर्घटना रोखण्यसााठी आणि वेळीच मदत कार्य करता यावं यासाठी या अधिकाऱ्यांनी संबंधित लेकवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
जलस्तर वाढणार, अलर्ट राहा
सीसीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी म्हणजे आज या बॅरियर लेकमध्ये 20 लाख क्युबिक मीटर पाणी असल्याचं आढळून आलं आहे. हे पाणी ओव्हरफ्लो होत आहे. सध्याचं हवामान पाहता येत्या तीन दिवसात या लेकमध्ये 30 लाख क्युबिक मीटर पाणी येऊ शकतं. त्यामुळे बांध तुटण्याची भीती अधिक वाढणार आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा एकदा मोठा हाहाकार उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनी अधिकाऱ्यांनी येत्या 72 तासासाठी अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.
तिबेटमध्ये 558 लोक बेपत्ता
या नव्या संकटाच्या आधीच नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवार भीषण भूस्खलन आणि महापुराने मोठा हाहाकार उडवला आहे. तिबेटमधील कमीत कमी 558 लोक बेपत्ता आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, नेपाळच्या सीमेतील 100 चीनी नागरिक बेपत्ता आहेत. बुधवारी सकाळी अचानक विनाशकारी पूर आला. त्यामुळे नेपाळमध्ये कमीत कमी 332 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. घरं, रस्ते आणि विजेचे पोल सर्व वाहून गेले आहेत.
युद्धस्तरावर मदतकार्य सुरू
धोका पाहता संवेदनशील भागातील गावं रिकामी करण्यात आली आहेत. चीनने मदत कार्यासाठी बीजिंग आणि चेंगदूहून विशेष अग्निशमन आणि बचाव पथक पाठवलं आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे मदत कार्य केलं जाणार आहे. दरम्यान, जिइरोंग येथील केंद्रीय शहरातील काही भागात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. पण बंदर काठच्या भागात अजूनही अंधार आहे.
