जगानेही असं दुर्देवी चित्र कधीच पाहिलं नव्हतं, नेपाळवर भयंकर वेळ; पाच दिवसानंतरही 2500…
नेपाळमध्ये आलेल्या महापुराने भीषण हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत 788 लोकांचा मृत्यू झाला असून, पाच दिवसांनंतरही 2500 लोक बेपत्ता आहेत. मृतदेहांची ओळख न पटल्याने सामूहिक अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. अनेक पूल तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

नेपाळमध्ये आलेल्या महापुराने मोठा हाहा:कार माजवला आहे. नेपाळच्या जलप्रलयात आतापर्यंत 788 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2500 लोक अजूनही बेपत्ता आहेत. पाच दिवस उलटल्यानंतरही या लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही. रोज असंख्य मृतदेह मिळत आहे. त्यांची ओळखही पटत नाहीये. त्यामुळे पाच दिवसानंतर नेपाळमध्ये या मृतदेहांवर सामूहिक अंतिम संस्कार केले जात आहेत. नेपाळवर अशी दुर्देवी वेळ कधीच आली नव्हती. नेपाळी नागरिकांना मात्र हुंदके देत हे दुर्देवी चित्र पाहावं लागत आहेत.
रविवारीही अनेक प्रभावित परिसरात रेस्क्यू कार्य सुरूच होतं. आतापर्यंत 9,435 लोकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. पण पाण्याचा स्तर पुन्हा वाढल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. भोटेकोशी नदीचा जलस्तर वाढल्याने लोकांना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य नेपाळच्या त्रिशुलीच्या नदीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. तब्बल तीन तास पाण्याचा जोरदार वेग आल्याने घ्यालचोक-चारौदी पूल वाहून गेला आहे. 130 मीटर लांब हा पूल गोरखा जिल्ह्यातील घ्यालचोक परिसराला पृथ्वी हायवेला जोडतो. पूल तुटल्याने आसपासच्या 400 कुटुंबाचा मुख्य रस्ता बंद झाला आहे.
सामूहिकरित्या अंतिम संस्कार
पुरानंतर मोठ्या संख्येने नेपाळमध्ये मृतदेह सापडत आहे. या मृतदेहांची ओळख पटत नाहीये. त्यामुळे नेपाळ सरकारसमोर वेगळंच टेन्शन उभं राहिलं आहे. त्यामुळे ओळख पटवून चौकशी करून सामूहिकरित्या अंतिम संस्कार केले जात आहे. तर अनेक कुटुंब आपल्या कुटुंबियांना शोधण्यासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धावाधाव करत आहेत. रुग्णालयांमध्ये शेकडो लोकांची गर्दी झाली आहे. आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी हे लोक आले आहेत.
पूल तुटला अडचणी वाढल्या
हा पूल केवळ येण्याजाण्याचा मार्गच नव्हता तर शेतकऱ्यांना दूध आणि भाजीपाला नेण्याचा एक मार्ग होता. याच मार्गाने शेतकरी कृषी सहकारी संस्थेत आपला माल घेऊन जायचे. आता पूल वाहून गेल्याने सामान बाजारात नेणं कठिण झालं आहे. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी पुरात धवादिघाटचा पूल वाहून गेला होता. त्यामुळे स्थानिकांना दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागत होता. आता तो मार्गही बंद झाला आहे.
महापुरासोबत गाळ आणि ढिगारा वाहून आल्याने या परिसराचं चित्रच बदलून गेलं आहे. रसुवामध्ये अनेक घरं कोसळून त्यांचा ढिगारा उरला आहे. चीनच्या बॉर्डरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग तुटला आहे. त्यामुळे मदतकार्य नेण्यास अडचण येत आहे. तसेच व्यापारालाही ब्रेक लागला आहे. मात्र, या रस्त्याचा 150 मीटरचा भाग दुरुस्त करण्यात आल्याने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर बाकीचा भाग दुरुस्त केला जात आहे.
जिवंत माणसांचा शोध सुरू
नेपाळमध्ये सर्वात कठिण रेस्क्यू ऑपरेशन हायड्रोपॉवर प्रोजेक्ट्सच्या सुरुंगात सुरू आहे. रसुवाच्या अपर त्रिशुली -1 प्रकल्पात फसलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नेपाळी सैन्यासोबत, भारत, चीन आणि दक्षिण कोरियातील एक्स्पर्ट्स मदत करत आहेत. भारतीय विशेषज्ञांच्या मदतीने रसुवामध्ये दोन दिवसाच्या आत 250 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. भारतीय टीम सुरुंगच्या सुमारे तीन किलोमीटर आत जाऊन लोकांचा शोध घेत आहे. या शिवाय चिलिमे आणि लांगटांग परिसरात नेपाळी सैन्यासोबत मिळून भारताचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या ठिकाणी नेपाळी सैन्य, सशस्त्र पोलिसांचे स्निफर डॉग्स आणि नेपाळ पोलीससहीत 90 लोकांची टीम तैनात आहे.
