पाकिस्तानचे पंतप्रधान होताच शाहबाज यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारताला दिली धमकी

| Updated on: Mar 04, 2024 | 5:56 PM

Pakistan PM on Kashmir : पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी लगेचच काश्मीरच्या मुद्द्यावर भारतविरोधी वक्तव्य केले आहे. एकीकडे पाकिस्तानात अनेक अडचणी असताना पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी पुन्हा जुनीच कॅसेट वाजवली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान होताच शाहबाज यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारताला दिली धमकी
Follow us on

Pakistan New PM : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ पुन्हा एकदा विराजमान होणार आहे. ते दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. पाकिस्तानात निवडणुका पार पडल्यानंतर कोणाचं सरकार येणार याबाबत प्रश्नचिन्ह होते. कारण कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. पण आता शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांनी लगेचच काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे.ते म्हणाले की,  ‘काश्मीरमध्ये रक्त सांडले जात असून संपूर्ण खोरे रक्ताने लाल झाले आहे.’ आंतरराष्ट्रीय समुदायावर यावेळी त्यांनी टीका केली.

पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान

शाहबाज शरीफ यांनी संसदेत काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी ठराव मंजूर करण्याचे आवाहन केले. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान होणार आहेत. संसदेत त्यांना २०१ मते पडली, तर विरोधी पीटीआय पक्षाचे उमेदवार उमर अयुब खान यांना ९२ मते मिळाली. सर्व देशांसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. पण काश्मीरबाबत ते आपल्या जुन्याच भूमिकेवर ठाम असल्याचं दिसलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रपती आरिफ अल्वी उद्या दुपारी ३ वाजता शाहबाज शरीफ यांना शपथ देतील. यावेळी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक कक्कर, सर्व प्रांतांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

शाहबाज शरीफ यांनी संसदेत जम्मू-काश्मीर, गाझा आणि पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर वक्तव्य केली. पीटीआय समर्थक खासदारांचा निषेध करत ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये निष्पाप काश्मिरींचे रक्त सांडले जात आहे. काश्मीर खोरे त्यांच्या रक्ताने लाल झाले आहे, परंतु संपूर्ण जग शांत आहे, त्यांचे ओठ शिवले आहेत, त्यांची कारणे काय आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे.”

‘काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी’ ठराव मंजूर करण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप केल्यांतर सुदान, सोमाली बेटांसारख्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. याचाच हवाला देत शाहबाज शरीफ यांनी पॅलेस्टाईन, गाझा आणि काश्मीरमध्ये ‘दडपशाही’ विरोधात ठराव मंजूर करण्याचे आवाहन केले. यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन त्यांनी विरोधकांना केले आहे.

पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी त्यांचा मोठा भाऊ नवाझ शरीफ यांची गळाभेट घेतली. यावेळी सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी खासदारांचे आभार मानले. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी निवडणुका पार पकडल्या होत्या. त्यानंतर निकाल लागला. या दरम्यान निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला. शेवटी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने शाहबाज शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला.