अमेरिकेशी डील होणारच होती, पण.. ऐन वेळेस पाकमध्ये कुठे शिंकली माशी ? परराष्ट्रमंत्र्यांचा मोठा खुलासा

इस्लामाबादमध्ये झालेली अमेरिका-इराण शांतता चर्चा 21 तासांनंतरही निष्फळ ठरली. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत खुलासा केला आहे. दोन्ही देशांमधील वाचाघाटी अंतिम टप्प्यात होत्या, कराराचा क्षण जवळ आला होता पण... काय म्हणाले अराघची ?

अमेरिकेशी डील होणारच होती, पण..  ऐन वेळेस पाकमध्ये कुठे शिंकली माशी ? परराष्ट्रमंत्र्यांचा मोठा खुलासा
सैयद अब्बास अराघची
| Updated on: Apr 13, 2026 | 9:24 AM

गेल्या आठवड्यात युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये शांततेसाठी चर्चा झाल. इराण व अमेरिका, दोन्ही देशांचे प्रतिनिधी या चर्चेसाठी पाकमध्ये गेले, त्यांच्यात जवळपास 21 तास सलग चर्चा झाली. मात्र यानंतरही काहीच चतोडगा निघाला नाही, कोणत्याही मुद्यावर एकमत न झाल्याने इराण-अमेरिकेतील ही चर्चा फिस्कटली, निष्फळ ठरली. त्यामुळे जगाला मोठा धक्का बसला असून आता पुढे काय असा प्रश्न निर्माण होत आहे. पुन्हा युद्धाचे ढग घोंगावण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिका व इराणमध्ये झालेल्या चर्चेत माशी नेमकी कुठे शिंकली, त्यांच्यात डील का होऊ शकली नाही, असेही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यातच आता इराणने याबद्दल मोठं विधान केलं आहे. अमेरिकेशी करार होणारच होता, ही डील झालीच असती पण शेवटच्या क्षणी ही चर्चा फिस्कटली असं इरणचे परराष्ट्र मंत्री अराघची म्हणाले.

28 फेब्रुवारीला अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला चढवला आणि युद्धाला तोंड फुटलं. सलग 40 दिवस हे युद्ध, विध्वंस सुरू होता. अखेरीस गेल्या आठवड्यात इराण व अमेरिकेने एक पाऊल पुढे टाकत युद्धविराम घोषित केला. त्यानंतर दोन्ही देश शांतता चर्चेसाठीही तयार झाले. जवळपास चार दशकानंतर अमेरिका आणि इराण हे प्रत्यक्ष चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये एकत्र आले होते. मात्र 21 तासं बोलणी करूनीह त्यांच्यात एकमत न झाल्याने चर्चेवर काहीच अंतिम निकाला आला नाही, ती निष्फळ ठरल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आलं. यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून लागू असलेल्या सीजफायरच्या भविष्यावरही आता टांगती तलवार आहे. शांतता चर्चा अपयशी ठरल्याचे खाप दोन्ही देशांकडून एकमेकांवर फोडलं जात आहे.

दोन्ही देशांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पण वाईट बातमी अशी की या चर्चेत एकमत न झाल्याने, कोणताही ठोस करार न करता आम्ही पाकिस्तान सोडत आहोत असे अमेरिकेकडून सांगण्यात आलं तर व्हान्स यांच्या निवेदनानंतर इराणनेही आपली बाजू मांडली असून अमेरिकेच्या “फालतू मागण्यांमुळे” ही चर्चा अयशस्वी झाल्याचं इराणने म्हटलं.

काय म्हणाले परराष्ट्रमंत्री ?

त्यातच आता इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून आपली बाजू स्पष्ट केली आहे. दोन्ही पक्ष (अमेरिका- इराण) करार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, मात्र तेव्हाच समोर वाढत्या मागण्या, बदलती उद्दिष्ट्ये आणि नाकेबंदी उभी राहिली. दोन्ही पक्षांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी अराघची यांनी हे विधान केले.

अराघची म्हणाले की, “युद्ध संपवण्याच्या चांगल्या हेतूने” इराणने अमेरिकेशी चर्चा केली. “जवळपास 50 वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये ही सर्वोच्च स्तरावरील चर्चा झाली. अशा प्रकारची उच्चस्तरीय चर्चा होऊन 47 वर्षं उलटली आहेत. इराणने युद्ध संपवण्याच्या चांगल्या हेतूने अमेरिकेशी वाटाघाटी सुरू केल्या. मात्र , जेव्हा आम्ही अगदी शेवटच्या टप्प्यावर, ‘सामंजस्य करारा’च्या अगदी जवळ पोहोचलो होतो, तेव्हाच ही चर्चा फिस्कटली, ‘ असं अराघची म्हणाले. चर्चा अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी थेट अमेरिकेला जबाबदार ठरवलं.

21 तासांच्या चर्चेनंतर इराण व अमेरिका डीलच्या अगदी जवळ पोहोचले, मात्र आम्हाला अवाजवी मागण्या, सतत बदलणारी उद्दिष्ट्ये आणि अडथळ्यांचा सामना करावा लागला. अमेरिकन शिष्टमंडळाने शेवटच्या क्षणी ‘अतिवादी’ भूमिका घेतली. चर्चा शेवटच्या टप्प्यात असतानाच हे अडथळे आल्यामुळे जवळजवळ पूर्ण झालेला करार अयशस्वी ठरला. मात्र तिथे नेमकं काय झालं, चर्चा नेमकी कशामुळे फिस्कटली यावर त्यांनी अधिक तपशील दिला नाही.

 

अमेरिकेला हुकूमशाही सोडावी लागेल

अराघची यांच्या वक्तव्याच्या काही तास आधी, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देखील करार होऊ शकतो असे संकेत दिले होते, परंतु अमेरिकेला आपली हुकूमशाही सोडून इराणच्या हक्कांचा आदर करण्याचे आवाहन केलं होतं. “जर अमेरिकन सरकारने आपली हुकूमशाही सोडून इराणी जनतेच्या हक्कांचा आदर केला, तर करार करण्याचे मार्ग निश्चितच सापडतील ” असं ते म्हणाले होते.

 

Follow Us