Nepal PM Balendra Shah : ‘आमच्याकडे पुरावे आहेत, भारताकडे जर..’, सीमावादात नेपाळच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य
Nepal PM Balendra Shah : नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याऐवजी सीमावादाचा विषय उकरुन काढला आहे. या मुद्यावर ते सतत मतप्रदर्शन करत आहेत. यामुळे ते आपल्याच देशात अडचणीत सुद्धा आले आहेत.

सीमावादाच्या विषयावरुन मायदेशात अडचणीत आलेले नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी या मुद्यावर काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. बालेंद्र शाह यांनी भारतासोबत सीमावादाचा विषय उकरुन काढला. भारतासोबत सीमावाद सोडवण्यासाठी ब्रिटनकडे मध्यस्थतेची कोणतीही मागणी केली नाही असं बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. चितवन जिल्ह्यात सत्तारुढ राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीच्या पहिल्या सम्मेलनात ते बोलत होते. “भारतासोबतच्या सीमावादात ब्रिटिश शासनाच्या काळातील पुराव्यांची गरज पडली, तर आम्ही सादर करु असं आम्ही म्हटलं होतं. आम्ही मध्यस्थेची मागणी केली नव्हती” असं बालेंद्र शाह म्हणाले. भारत आणि नेपाळमधील सीमावादावर एक संयुक्त कार्य समूह तोडगा काढेल असं परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल म्हणाले. त्यानंतर काही दिवसांनी बालेंद्र शाह यांनी हे वक्तव्य केलय.
नेपाळने वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या भूभागावर कब्जा केला आहे असं पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी मागच्या महिन्यात वक्तव्य केलं. त्यामुळे ते आपल्याच देशात वादात सापडले. नेपाळमधील विरोधी पक्ष त्यांच्यावर तुटून पडले होते. नेपाळने या विषयात मध्यस्थीसाठी चीन आणि ब्रिटनची मदत मागितली आहे अशी सुद्धा बातमी आलेली. भारताने या विषयात कुठल्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची शक्यता फेटाळून लावली होती.
सीमावाद कुठल्या भागावरुन आहे?
भारत आणि नेपाळमध्ये लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानीवरुन जुना सीमावाद आहे. दोन्ही देश या भागावर आपपाला दावा करतात. भारताचं म्हणणं आहे की, हा भाग उत्तराखंडचा हिस्सा आहे. हे मु्द्दे द्विपक्षीय चर्चेने सोडवले पाहिजेत. ‘सीमेसंबंधी माझ्या वक्तव्याची तुम्ही चिंता करु नका’ असं बालेंद्र शाह यांनी विरोधकांना म्हटलं आहे.
पुराव्यांबद्दल काय म्हणाले?
“आम्ही आमच्या शेजऱ्यासोबत बोलून या मुद्यावर तोडगा काढू. त्या बद्दल चिंता करण्याची गरज नाही” असं नेपाळचे पंतप्रधान रविवारी म्हणाले. राष्ट्रीयत्वाबद्दल माझ्या कटिबद्धतेवर शंका घेऊ नका असही ते लोकांना म्हणाले. कोणाच्याही मनात या बद्दल संशय असू नये असं ते म्हणाले.
कालापानी आणि लिपूलेख नेपाळचा भाग असल्याचे आमच्याकडे पुरावे असल्याचा दावा बालेंद्र शाह यांनी केला. भारताकडे पुरावे असतील तर त्यांनी दाखवावेत असं बालेंद्र शाह पक्षाच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले.