Balen Shah : भारत विरोधातील डाव नेपाळी पंतप्रधान बालेन शाह यांच्यावरच उलटला, आधी ब्रिटन आता अजून एका देशाने उभं केलं नाही
Balen Shah : भारताविरोधात डाव खेळणं नेपाळी पंतप्रधान बालेन शाह यांच्या चांगलचं अंगलट आलं आहे. आधी ब्रिटनने त्यांची विनंती धुडकावून लावली. आता अजून एका देशाने भारत-नेपाळ सीमावादात पडायला नकार दिला आहे.

भारत-नेपाळ संबंध सुधारण्यापेक्षा नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांना भारतासोबत नवनवीन वाद उकरुन काढण्यात जास्त रस दिसत आहे. आधी त्यांनी भारतातून आयात होणाऱ्या सामानावर सीमा शुल्क वाढवलं. आता सीमावादाचा विषय उपस्थित केला आहे. त्यात स्वत:च्याच एका वक्तव्यामुळे ते नेपाळच्या विरोधी पक्षांच्या रडारवर आले. “पंतप्रधान झाल्यावर मला कळलं की, नेपाळने सुद्धा भारताच्या काही भूभागावर कब्जा केला आहे” असं वक्तव्य करुन त्यांनी नेपाळ मधल्या विरोधी पक्षांच्या हातात आयातं कोलीत दिलं. नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीने त्यांच्या या स्टेटमेंटला राष्ट्रद्रोही ठरवलं. भारत-नेपाळ सीमाप्रश्न आंतरराष्ट्रीय बनवण्याचा त्यांचा इरादा आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यात अजिबात यश मिळणार नाही. उलट त्यांना झटके सहन करावे लागतायत.
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत-नेपाळ सीमावादात तिसऱ्या देशाची एन्ट्री करण्याचे भरपूर प्रयत्न करत आहेत. आधी त्यांनी ब्रिटनला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. सुगौली कराराचा हवाला देत ब्रिटनही एक पक्षकार असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण ब्रिटनने त्यांची विनंती फेटाळून लावली. हा भारत-नेपाळमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचं ब्रिटनने म्हटलं. त्यानंतर आता ते चीनला या विषयात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चीनने सुद्धा मध्यस्थीसाठी कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे सीमावादाच्या विषयातून राष्ट्र भावनेला हात घालण्याचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट येताना दिसतोय.
‘आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही’
“मी चीन आणि ब्रिटनशी संपर्क साधला. सीमावाद सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे” असं रविवारी बालेन शाह नेपाळी संसेदत बोलताना म्हणाले होते. बालेन शाह यांचे मुख्य सल्लागार कुमार ब्यांजंकर यांनी काही दिवसांपूर्वी राजधानी काठमांडूमध्ये ब्रिटिश राजदूत रॉब फेन यांची भेट घेऊन भारत-नेपाळ सीमावादात मध्यस्थीची मागणी केली होती. द टेलीग्राफने नेपाळमधील ब्रिटनचे राजदूत रॉब फेन यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं होतं. सीमावाद हा भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय विषय आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही असं फेन यांनी नेपाळी पंतप्रधानांच्या सल्लागारांना सांगितलं. थेट असं सांगणं म्हणजे बालेन शाह यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय धक्का होता.
कुठलं अधिकृत स्टेटमेंटही दिलं नाही
1816 मध्ये सुगौली करार झाला. यात भारत-नेपाळची सीमा निश्चित करण्यात आली होती. बालेन शाह यांनी चीनकडे मदत मागितली होती. पण चीनने काही उत्तर दिलं नाही. चीनने यावर कुठलं अधिकृत स्टेटमेंटही दिलं नाही. यात इंटरेस्टिंग बाब म्हणजे वेळोवेळी नेपाळ चीनवर सुद्धा जमीन बळकवल्याचा आरोप करत असतो.
