
रेल्वेने प्रवास करताना तुम्ही अनेकदा डब्यांमध्ये लटकणारी लाल रंगाची आपत्कालीन साखळी पाहिली असेल. काही जणांनी ती वापरून पाहिलीही असेल. पण एक छोटीशी साखळी ओढल्यावर इतकी मोठी ट्रेन थांबते तरी कशी? यामागे कोणती टेक्नोलॉजी कार्य करते? हा प्रश्न अनेकांना पडतो. चला, या यंत्रणेचं वैज्ञानिक स्पष्टीकरण समजून घेऊया.
भारतीय रेल्वेतील प्रत्येक डब्यात ‘एमर्जन्सी चेन’ असते. ही साखळी केवळ एक दोरी नाही, तर संपूर्ण ट्रेनच्या सेफ्टी सिस्टीमचा भाग असते. या साखळीचा उपयोग करणे म्हणजे रेल्वेच्या ब्रेक यंत्रणेला तातडीने अॅक्टिव्ह करणे.
ही साखळी एक यांत्रिक प्रणालीशी जोडलेली असते, ज्याला “अलार्म चेन पुलिंग” सिस्टीम म्हणतात. ही सिस्टीम थेट ट्रेनच्या ब्रेक पाइपशी जोडलेली असते. भारतात बहुतांश रेल्वे ट्रेनमध्ये ‘एअर ब्रेक सिस्टीम’ वापरली जाते. या पद्धतीत संपूर्ण ट्रेनमधून एका पाइपमध्ये दाबयुक्त हवा (Compressed Air) सतत प्रवाहित होते. ही हवा ब्रेक्सना ‘रिलीज’ स्थितीत ठेवते.
1. कोणीही साखळी ओढल्यावर एक छोटा वाल्व उघडतो.
2. वाल्व उघडल्याने ब्रेक पाइपमधील हवा बाहेर पडते.
3. हवा कमी झाल्याने यंत्रणा आपोआप ब्रेक्स अॅक्टिव्ह करते.
4. सगळ्या कोचमधील ब्रेक्स लागतात आणि ट्रेन थांबते.
5. आधुनिक ट्रेनमध्ये ड्रायव्हरच्या पॅनलवर चेन ओढली गेल्याचं इंडिकेशन मिळतं.
ट्रेन थांबल्यानंतर ट्रेनचा गार्ड किंवा कर्मचारी त्या कोचमध्ये पोहोचतात. जर ही साखळी विनाकारण, म्हणजे केवळ गोंधळासाठी ओढली गेली असेल, तर संबंधित व्यक्तीवर रेल्वे कायद्यानुसार कारवाई केली जाते. यामध्ये दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो.
भारतीय रेल्वे आता या यंत्रणेला आणखी अपग्रेड करत आहे. नवीन ट्रेनमध्ये चेन पुलिंगच्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी CCTV, इलेक्ट्रॉनिक अलार्म सिस्टम आणि ब्रेक सिलेंडरमध्ये सेन्सर्स लावले जात आहेत, जे नेमकं कोणत्या डब्यात साखळी ओढली गेली हे सांगतात.
ट्रेनमध्ये लटकणारी आपत्कालीन साखळी ही केवळ एक दोरी नाही, तर एक जबाबदारी आहे. ही यंत्रणा जीवन वाचवण्यासाठी आहे. मात्र तिचा गैरवापर केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतात. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये चढाल, तेव्हा त्या साखळीचा उपयोग अत्यंत गरजेच्यावेळीच करा.