भारतातील असं एक राज्य… महिला देतात सर्वाधिक मुलांना जन्म, नाव ऐकून धक्काच बसेल
भारतातील राज्यांमधील प्रजनन दराचा आढावा घेताना, बिहारमध्ये सर्वाधिक जन्मदर (2.8-3.0) दिसून येतो, तर सिक्कीममध्ये तो सर्वात कमी (1.1) आहे. देशाचा एकूण प्रजनन दर 2.0 पर्यंत खाली आला आहे, जो लोकसंख्या स्थिरीकरणाचे संकेत देतो.

देशात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे एकच मूल ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. कुटुंबनियोजनावर भर दिला जात आहे. एवढेच नव्हे तर तिसरं अपत्य असेल तर निवडणूक लढवण्यास मज्जावही करण्यात आलेला आहे. मात्र, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मात्र उरफाटा कारभार सुरू केला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी कुटुंब वाढवण्यावर भर दिला आहे. लोकांनी कुटुंब वाढवावं म्हणून त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशातील कोणत्या राज्यात महिला सर्वाधिक मुलांना जन्म देतात आणि कोणत्या राज्यात जन्मदर सर्वाधिक कमी आहे, याचा घेतलेला हा आढावा.
बिहारमध्ये सध्या सर्वाधिक जन्मदर आहे. बिहारचा एकूण प्रजनन दर 2.8 ते 3 दरम्यान आहे. म्हणजे राज्यातील महिला त्यांच्या जीवनकाळात सरासरी तीन मुलांना जन्म देतात. त्यानंतर मेघालयचा जन्मदर 2.9 आहे. तर उत्तर प्रदेशचा प्रजनन दर 2.4 ते 2.7 इतका आहे. झारखंडमध्येही 2.3 इतका जन्मदर आहे. देशात प्रजनन दरात बिहार अव्वल असला तरी सिक्कीम मात्र या स्पर्धेत सर्वात खाली आहे. सिक्कीममध्ये जन्मदर 1.1 इतरा आहे. म्हणजे लोकसंख्या वाढीसाठी लागणारा प्रजनन दरही सिक्कीमचा नाहीये.
दिल्ली ठिक, गोव्याचं काय?
दिल्लीसारख्या शहरातही एकूण प्रजनन दर 1.2 ते 1.4 च्या दरम्यान आहे. तर गोवा, अंदमान द्वीप समूह आणि निकोबार द्वीप समूहात बदलती जीवन शैली आणि उशिराने करण्यात आलेल्या कुटुंबनियोजनामुळे तिथला जन्म दर 1.3 एवढा राहिलेला आहे.
दाक्षिणात्य राज्यात…
केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशासहीत दाक्षिणात्य राज्यात प्रजनन दरात वेगाने घट झालेली पाहायला मिळत आहे. या ठिकाणी महिला सरासरी 1.4 ते 1.6 मुलांना जन्म देतात. NFHS-5 आणि SRSच्या आकडेवारीनुसार भारतातील समग्र प्रजनन दर घटून 2.0 च्या जवळ गेली आहे. देशातील जनसंख्येच्या स्थिरीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत यातून मिळत आहेत.
चंद्राबाबूंची घोषणा काय?
चंद्राबाबू नायडू यांनी तिसरं मुल जन्माला आल्यास 30 हजार रुपये आणि चौथं मुल जन्माला आल्यास 40 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसनपेटा येथे स्वर्ण आंध्र, स्वच्छ आंध्र स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा केली आहे. धन कमावून गरिबांमध्ये वाटलं पाहिजे. आर्थिक असमानता दूर झाली पाहिजे. सरकार काही चांगलं काम करतंय आणि सरकारचं कौतुक होत असेल तर त्याचं सर्व श्रेय अधिकाऱ्यांना जातंय, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले होते.