नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, पाथर्डीकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

| Updated on: Nov 05, 2020 | 11:06 AM

गेल्या महिनाभरात तीन चिमकुल्यांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलं आहे. वनविभागाने रचलेल्या सापळ्यात आज पहाटे नरभक्षक बिबट्या अडकला. बिबट्याला पकडण्यात यश आल्यानं पाथर्डी तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, पाथर्डीकरांनी सोडला सुटकेचा निश्वास
Follow us on

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यात गेल्या महिन्यात तीन चिमुकल्यांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलं आहे. या बिबट्याने पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात 3 चिमुकल्यांनी आपला जीव गमावला होता. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. पण बिबट्या हाती लागत नव्हता. अखेर आज पहाटे सावरगाव परिसरात बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं. (Forest department succeeds in capturing leopard in Pathardi Tehsil )

नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यासाठी अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीड मधून वनविभागाची पथके पाथर्डीत दाखल झाली होती. महिनाभरापासून या बिबट्याचा शोध सुरु होता. या दरम्यान त्याने तीन चिमुकल्यांचा बळी घेतला आणि एका गायीवरही हल्ला केला. अखेर आज पहाटे वनविभागाने रचलेल्या सापळ्यात बिबट्या अडकला. त्यामुळे पाथर्डीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात 3 चिमुकल्यांचा बळी

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिन्यात 3 चिमुकल्याचा जीव गेला आहे. 15 ऑक्टोबरला उषा साळवे या साडे तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. 22 ऑक्टोबरला 8 वर्षीय सक्षम आठरे हा बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावला. तर 29 ऑक्टोबरला सार्थक बुधवंत या चिमुकल्याला बिबट्यानं पळवून नेलं होतं. बिबट्या लहान मुलांवर हल्ला चढवत असल्यानं परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. परिसरातील नागरिक वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करत होते. महत्वाची बाब म्हणजे चिमुकल्याचा शोध घेण्याऐवजी वनविभागाचे कर्मचारी रात्री दारु पार्टीत दंग असल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी केला होता.

नातवावरचा वार आजीने झेलला, टोपलीने मारुन बिबट्याला पळवलं!

तिकडे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या चालगणी गावात काही दिवसांपूर्वी धुरपताबाई सातलवाड ही महिला आपला नातू रितेश सोबत शेतातील सोयाबीन काढण्यासाठी जात होती. त्याच वेळी बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक लहानग्या रितेशवर हल्ला केला. त्यावेळी कोणतीही भीती न बाळगता धुरपताबाईंनी हातातील टोपले बिबट्यावर फेकले.आजींनी केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर चवताळलेल्या बिबट्याने नातवाला सोडून आजींवर हल्ला केला. बिबट्याने आजींच्या मानेवर पंजाने वार केला. तसेच जबड्याने त्यांच्या हाताचा लचका तोडला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे आजी विव्हळल्या. तिथे आरडाओरड सुरु झाली. त्यामुळे आजूबाजूच्या शेतशिवारातील लोक एकत्र आले. काहींनी लगेच आजींकडे धाव घेतली. लोकांची मोठी गर्दी झालेली पाहून बिबट्या घाबरला. लोक बिबट्यावर हल्ला करणार एवढ्यात बिबट्या तिथून पळून गेला. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आसपासच्या परिसरातील शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण आहे. पण आजींच्या साहसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संबंधित बातम्या:

पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिनाभरात 3 चिमुकल्यांचा मृत्यू, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दारु पार्टीचा आरोप

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, 10 दिवसातील दुसरी घटना

Forest department succeeds in capturing leopard in Pathardi Tehsil