दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही : अजित पवार

| Updated on: Oct 17, 2020 | 5:07 PM

मंदिरं आणि शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न सातत्याने सरकारला विचारला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही : अजित पवार
Follow us on

सोलापूर : कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यानंतर मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून देशभरातील शाळा बंद आहेत. राज्यातही मार्चपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यानुसार हळूहळू दुकानं, बाजार, रेस्टॉरंट्स सुरु करण्यात आले. आगामी काळात चित्रपटगृह, रेल्वे सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यातच मंदिरं आणि शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न सातत्याने सरकारला विचारला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Ajit Pawar says We will not decide to start schools till Diwali)

अजित पवार म्हणाले की, “अनलॉकच्या प्रक्रियेदरम्यान आम्ही क्रमाक्रमाने सर्वकाही सुरु करणार आहोत. परंतु ते करत असताना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेतली जाईल. शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न विचारला जातोय. परंतु आत्ता तरी ते शक्य नाही”.

पवार म्हणाले की, “शेजारच्या राज्यांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या खऱ्या, मात्र तिथे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवायला घबरत आहेत. आपल्या मुलाला कोरोना झाला तर काय करायचं असा प्रश्न त्यांना पडतो. आम्हालाही मुलांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही. आम्ही दिवाळीनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतरच शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेऊ”.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, “राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दररोज नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडतात, त्याची संख्या कमी होऊ लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला बरे होऊन घरी परतणाऱ्या नागरिकांची संख्या मात्र वाढत आहे. ही राज्यासाठी चांगली बातमी आहे. राज्यभरात सर्वत्र कोरोनाची परिस्थिती हातळण्यासाठी प्रशासन सक्षम आहे. आपल्याकडे पुरेसे बेड आहेत, मुबलक प्रमाणात औषधं आहेत. ऑक्सिजन आहे. रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे आपण कोरोनाशी लढा देऊ शकतो”.

“नागरिक कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्यात कमी पडत आहे, असे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दंडवसुली होत आहे. त्याची आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं की, लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे”.

संबंधित बातम्या

भल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश

ईडी सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार; अजित पवार पुन्हा गोत्यात?

बुलडाण्यात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ‘शोले’ स्टाईल आंदोलन

(Ajit Pawar says We will not decide to start schools till Diwali)