आषाढी वारी फक्त वीस वारकऱ्यांसोबत करा, आळंदीच्या ग्रामस्थांचा पर्याय

| Updated on: May 10, 2020 | 11:10 AM

सरकारच्या नियमानुसार आषाढी एकादशीला (1 जुलै) प्रदक्षिणा, द्वादशीचे पारणे फेडून पालखी पुन्हा आळंदीकडे मार्गस्थ करावी, असा पर्यायही निवेदनात सुचवण्यात आला आहे. (Alandi Villagers suggestion for Ashadhi Ekadashi Wari Pandharpur)

आषाढी वारी फक्त वीस वारकऱ्यांसोबत करा, आळंदीच्या ग्रामस्थांचा पर्याय
Follow us on

पुणे : पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळ्यावर ‘कोरोना’चं सावट आहे. यंदा आषाढी वारी फक्त वीस वारकऱ्यांच्या सोबत करा, असा पर्याय आळंदीच्या ग्रामस्थांनी पंढरपूर देवस्थानला सुचवला आहे. (Alandi Villagers suggestion for Ashadhi Ekadashi Wari Pandharpur)

पालखी सोहळा वद्य अष्टमी म्हणजेच 13 जून रोजी करु नका, त्याऐवजी थेट आषाढ शुद्ध दशमी म्हणजे 30 जून रोजी मोजक्या वीस वारकऱ्यांसोबत माऊलींची पालखी पंढरपूरला न्या, असा पर्याय आळंदीच्या ग्रामस्थांकडून सुचवण्यात आला आहे. आळंदीच्या रहिवाशांनी सह्यांचे निवेदन पंढरपूर देवस्थानला दिले आहे. सोहळा वाटेत कोठेही न थांबता थेट पंढपूरला न्या, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

सरकारच्या नियमानुसार आषाढी एकादशीला (1 जुलै) प्रदक्षिणा, द्वादशीचे पारणे फेडून पालखी पुन्हा आळंदीकडे मार्गस्थ करावी, असा पर्यायही निवेदनात सुचवण्यात आला आहे.

महाराष्ट्रभरातून मानाच्या सात पालख्यांसह छोट्या-मोठ्या शंभर ते दीडशे पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे दरवर्षी मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. मात्र, या वर्षी पंढरपूर वारीवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे वारकऱ्यांनीही घरुनच पंढरीच्या विठुरायाला नमस्कार करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे.

सोहळ्यात पालखी सोहळा मालक, प्रमुख विश्वस्त, पालखी सोहळाप्रमुख, चोपदार, मानकरी, शिपाई, दिंडीकरी, विणेकरी, टाळकरी, पखवाद वादक, झेंडेकरी, तुळस घेणारी महिला वारकरी आणि पुजारी अशा मोजक्याच लोकांचा सहभाग असावा. माऊलींच्या पादुका ट्रकमधे किंवा सजवलेल्या रथात ठेवाव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : माऊलींच्या पालखीची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्धार, नियमांचे काटेकोर पालन करणार

दोन दिवसांपूर्वी आळंदी देवस्थानने आषाढी वारीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. त्या अनुषंगाने यंदाच्या वर्षी सोहळा कशा स्वरुपात पार पाडावा याबाबत दिंडीकरी, फडकरी आणि वारकऱ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांच्या सूचनांवर पंढरपूर देवस्थान काय निर्णय घेतं, हे पाहणं उत्सुकतेचे आहे.