प्रकल्पाची पळवापळवी नाहीच; देशमुखांनी विनायक राऊतांचे आरोप फेटाळले

| Updated on: Oct 06, 2020 | 6:13 PM

राज्य सरकारनेच या प्रकल्पासाठी जळगाव, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण अशा विभागांचा प्रस्ताव आयुष मंत्रालयाला दिल्याचेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पाची पळवापळवी नाहीच; देशमुखांनी विनायक राऊतांचे आरोप फेटाळले
Follow us on

लातूर: राष्ट्रीय आयुर्वेदिक वनस्पती संस्थेचा (national institute of medicinal plants) प्रकल्प कोकणातच राहावा. कोणीही प्रकल्पांची पळवापळवी करू नये, या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही कुठलीही पळवापळवी करत नाही. विनायक राऊत यांनी अपुऱ्या माहितीच्याआधारे हे वक्तव्य केले आहे. त्यांना यासंदर्भात अधिक माहिती पुरवली जाईल. मी स्वत: फोन करुन त्यांचा गैरसमज दूर करेन, असे अमित देशमुख यांनी सांगितले. (Amit Deshmukh refuse Shivsena allegations)

कोकणातील आढाळी येथे राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था उभारण्यात येणार आहे. मात्र, अमित देशमुख यांनी अचानक हा प्रकल्प लातूरला हलविण्याची मागणी केली होती. त्यामुळे विनायक राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत अमित देशमुख यांना फटकारले होते. महाविकास आघाडीत प्रकल्पांची पळवापळवी होऊ नये,वरिष्ठांनी याबाबत मध्यस्थी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली होती.

या आरोपांना मंगळवारी अमित देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही कुठलीही पळवापळवी करत नाही. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेईल. हा प्रकल्प महाराष्ट्रात यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. प्रकल्पाला चांगली जागा उपलब्ध करून देणे हे आमचे काम आहे. आयुष मंत्रालयाचे निरनिराळे प्रकल्प आहेत. सिंधुदुर्गासाठीही केंद्र सरकारचा हा प्रकल्प मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर केला जाईल, असे अमित देशमुख यांनी म्हटले.

तसेच राज्य सरकारनेच या प्रकल्पासाठी जळगाव, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण अशा विभागांचा प्रस्ताव आयुष मंत्रालयाला दिल्याचेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. ज्या भागाची माती आणि वातावरण पोषक असेल, तिथे हा प्रकल्प येईल. शेवटी हा निर्णय आयुष मंत्रालय घेणार आहे. त्यांनी जे पत्र आमच्याकडे पाठवले, ते पत्र आम्ही शिफारशींसह केंद्र सरकारकडे पाठवले. विनायक राऊत यांनी ज्या भावना व्यक्त केल्या तो त्यांचा अधिकार आहे. लातूरमध्ये हा प्रकल्प उभारण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

(Amit Deshmukh refuse Shivsena allegations)