‘राज्याने स्वतंत्र कृषी कायदा करून ‘एमएसपी’ अनिवार्य करावी’

| Updated on: Nov 05, 2020 | 8:59 PM

केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. | Ashok Chavan

राज्याने स्वतंत्र कृषी कायदा करून ‘एमएसपी’ अनिवार्य करावी
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या कायद्यामध्ये शेतमाल खरेदीच्या व्यवहारासाठी किमान आधारभूत किंमत अनिवार्य करण्यासह शेतकरी हिताच्या विविध तरतुदींचा समावेश असावा, असे त्यांनी म्हटले आहे. (Ashok Chavan demand Minimum support price for farmers)

अशोक चव्हाण यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील मागणीचे पत्र दिले. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. या कायद्यांमुळे तेथील शेतकरी व ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सुद्धा नवीन कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे, असे चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

खासगी खरेदीदारांना कृषीमालाच्या खरेदीचे करार व व्यवहार किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीने करण्यास प्रतिबंध घालणे, शेतमाल खरेदी-विक्रीबाबतचे करार व व्यवहारांसाठी शेतकऱ्यांची संमती अनिवार्य करणे, फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा हक्क प्रदान करणे, शेतकऱ्यांची फसवणूक अथवा छळ केल्यास दीर्घ मुदतीचा कारावास तसेच मोठ्या रक्कमेच्या आर्थिक दंडाची तरतूद करणे, व्यापाऱ्यांना शेतमालाचा अमर्याद साठा करता येणार नाही, यासाठी साठवण क्षमतेवर मर्यादा घालणे, कृषीमालाच्या व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लेटफार्मच्या माध्यमातून पारदर्शक लिलाव व ऑनलाईन पेमेंटची सुविधा प्रदान करणे आदी तरतुदींचा राज्याच्या कृषी कायद्यात समावेश असावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना सोमवारपासून भरपाई, लोकलबाबत रेल्वेला पत्र, मंदिरांचा निर्णय दिवाळीनंतर : वडेट्टीवार

दु:ख विसरुन बळीराजा पुन्हा सरसावला; परभणीत रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात

‘मातोश्री’वर आलेला ‘तो’ शेतकरी मदतीसाठी कृषीमंत्र्यांकडे, 8 दिवसात चौकशी करा, कृषीमंत्र्यांचे आदेश

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राचे पथक अजूनही आलेच नाही, आता विरोधक गप्प का?: विजय वडेट्टीवार

(Ashok Chavan demand Minimum support price for farmers)