नागपूर : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंडवरील गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच आज रिक्षाचालकाच्या हत्येची आणि त्यानंतर मृतदेहाच्या विटंबनेची घटना उघड झाली आहे. रिक्षाचालकांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेतून झालेली ही हत्या नागपूरकरांना हादरवणारी आणि दहशत पसरवणारी आहे.
नागपूरच्या नंदनवन परिसरातील खरबी रोडवर माल वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाची इतर दोन रिक्षाचलकांनी हत्या केली. राजेंद्र देशमुख असे या मृत रिक्षाचालकाचे नाव असून, गोलू ठाकरे आणि एजाज अनिस शेख अशी आरोपींची नावं आहेत.
गोलू ठाकरे आणि एजाज अनिस शेख या दोन आरोपींशी रिक्षाचलक राजेंद्र देशमुख यांचा जुना वाद होता. याच वादातून गोलू ठाकरे आणि एजाज शेख यांनी राजेंद्र देशमुख यांची हत्या केली. दोन्ही आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी राजेंद्र देशमुख यांचा मृतदेह रिक्षात टाकून खराबी परिसरात आणला.
या भागात आपलं वर्चस्व राहील, हे दाखवून देण्यासाठी गोलू ठाकरे आणि एजाज अनिस शेख यांनी राजेंद्र देशमुख यांच्या मृतदहेला लाथा-बुक्क्यांने पुन्हा मारहणा केली. मृतदेहाची अक्षरश: विटंबना केली. माणुसकीला कलंक लावणारा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.
राजेंद्र देशमुख यांची हत्या करणारे दोघेही सध्या फरार असून, पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर गोष्टींच्या मदतीने तपासाची चक्र फिरवली आहेत.
रिक्षाचालक राजेंद्र देशमुख हे खरबी परिसरात राहत असत. या परिसरातील लहान-मोठे वाद देशमुख सोडवत असायचे. गेल्या आठवड्यात वाद सोडवताना झटापट झाली आणि त्यात देशमुख यांनी एकाला मारहाण केली होती.