‘पवार साहेबांचा एक फोन पुरेसा’, नगरमधील शेतकऱ्यांची बागायत जमीन लष्कराला देण्याला बाळासाहेब थोरातांचा विरोध

| Updated on: Aug 26, 2020 | 6:31 PM

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरमधील के. के. रेंजच्या जमीन हस्तांतराला विरोध केला आहे (Balasaheb Thorat on Ahmednagar K K Range Farmer land).

पवार साहेबांचा एक फोन पुरेसा, नगरमधील शेतकऱ्यांची बागायत जमीन लष्कराला देण्याला बाळासाहेब थोरातांचा विरोध
Balasaheb Thorat sharad Pawar
Follow us on

अहमदनगर : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरमधील के. के. रेंजच्या जमीन हस्तांतराला विरोध केला आहे (Balasaheb Thorat on Ahmednagar K K Range Farmer land). निर्णय काहीही असो या भागातील आदिवासी आणि शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही या भूमिकेवर आपण ठाम आहोत. बागायती क्षेत्राचे हस्तांतर मनात आणणे हेच पाप असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी या प्रकरणी शरद पवार यांचे सहकार्य घेण्यात येईल, असं नमूद केलं. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवार साहेबांचा एक फोन पुरेसा आहे, असंही थोरात यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “या भागातील जमिनी बागायती आहेत. शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने त्या विकसित केल्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात धनगर आणि आदिवासी समाज आहे. लष्कराकडून राज्य शासनाने जमीन हस्तांतरीत करुन घेतली असेल, तर त्या बदल्यात लष्कराला जमीन हस्तांतरीत करणे बंधनकारक असते. परंतू त्यासाठी नगर जिल्ह्यातीलच जमीन देणे बंधनकारक नाही.”

“फडणवीस सरकारच्या काळात जमीन हस्तांतरप्रश्‍नी काही निर्णय झालेला आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येईल. निर्णय काहीही असो या भागातील आदिवासी आणि शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही. बागायती क्षेत्राचे हस्तांतर मनात आणणे हेच पाप आहे. या प्रकरणी शरद पवार यांचे सहकार्य घेण्यात येईल. त्यांची भेट घेउन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याजवळ जमीन हस्तांतरणास ठाम विरोध दर्शविला जाईल. शासनाने लष्करास इतर ठिकाणची जमीन हस्तांतरीत करण्याचा पर्याय निवडावा,” असंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

‘पवार साहेबांचा एक फोन पुरेसा’

शेतकऱ्यांची बागायत जमीन लष्कराला हस्तांतरिक करण्याच्या मुद्द्यावर बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांचीही मदत घेणार असल्याचं सांगितलं. तसेच शरद पवार यांचा एक फोन हा प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसा आहे असं नमूद केलं. ते म्हणाले, “के. के. रेंजच्या जमीन हस्तांतरप्रकरणी शरद पवार यांनी एक फोन केला तरी जमीन हस्तांतराचा प्रश्‍न निकाली निघेल. या प्रकरणी पवार यांची मदत घेतली जाईल.”

न्यायालयात दाद मागणे हा या प्रकरणातील शेवटचा पर्याय आहे. याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल, वन व मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेण्यात येईल. त्यात ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. नगरविकास, उर्जा, आदिवासी, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके यांच्यासह आज मंत्रालयात के. के. रेंजप्रश्‍नी बैठक पार पडली. यावेळी मंत्री तनपुरे यांनी थोरात यांच्याकडे जमीन हस्तांतर प्रकरणी सुरु असलेल्या हालचालींची माहिती दिली.

हेही वाचा :

काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, काहींना कमी, पण त्या पक्षाचं नाव घेणार नाही : थोरात

…त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं : बाळासाहेब थोरात

‘वर्षा’वर साडेतीन तास खलबतं, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नेमकी चर्चा काय?

Balasaheb Thorat on Ahmednagar K K Range Farmer land