BHARAT BAND | दिल्लीची प्रवेशद्वारं बंद! देशभरात ‘भारत बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

| Updated on: Dec 08, 2020 | 12:35 PM

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज चांदणी चौक आणि सदर बाजार परिसरात पेट्रोलिंग केलं. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत.

BHARAT BAND | दिल्लीची प्रवेशद्वारं बंद! देशभरात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
Follow us on

नवी दिल्ली: शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकऱ्यांनी बंद केले आहेत. (All routes to Delhi closed, good response to bharat band across the country)

चांदणी चौक, सदर बाजार परिसरात पोलिसांचं पेट्रोलिंग

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज चांदणी चौक आणि सदर बाजार परिसरात पेट्रोलिंग केलं. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत. दिल्लीच्या मोठ्या मार्केटची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये जागोजागी पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.

गुजरातमध्ये महामार्ग जाम

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदमध्ये आज गुजरातच्या ग्रामीण भागात तीन राज्यमार्ग जाम करण्यात आले आहेत. या मार्गांवर आंदोलकांनी टायक जाळले. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमहदाबाद-विरमगाम महामार्ग रोखून धरला. तर काही आंदोलकांनी वडोदरामध्ये साणंदजवळ राजमार्ग रोखला. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

आण्णा हजारेचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आपल्या राळेगणसिद्धी या गावात एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. कृषी कायद्याविरोधात सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. ‘दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळायला हवा. सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. मात्र कुठलीही हिंसा होता कामा नये’, असा संदेश हजारे यांनी दिला आहे.

गोव्यात भारत बंदचा परिणाम नाही

भाजपशासित राज्य असलेल्या गोव्यात भारत बंदचा परिणाम दिसून आला नाही. गोव्यातील सर्व बाजार आणि सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरु आहे. शाळा सुरु आहेत. दरम्यान, ज्यांचा कृषी कायद्यांना विरोध आहे असे राजकीय पक्ष आणि कामगार संघटना पणजीमध्ये आजाद मैदानावर आंदोलन करत आहेत.

गाझीपूर बॉर्डर दोन्ही बाजूंनी बंद

दिल्ली-मेरठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी महामार्गाची दुसरी बाजूही बंद केलीय. त्यामुळे दिल्लीत प्रवेश करता येणारे सर्व रस्ते आता बंद झाले आहेत.

आसाममध्ये आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

आसाममध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. हे आंदोलक भारत बंदच्या समर्थनात जनता भवन इथं आंदोलन करत होते.

कोलकातामध्ये डाव्यांनी पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळला

कोलकात्याच्या धर्मतला इथं डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धर्मतला परिसर चारही बाजूंनी बंद केला होता. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सुजान चक्रवर्ती यांनी संपूर्ण बंगाल शेतकऱ्यांच्या समर्थनात बंद असल्याचा दावा केला.

संबंधित बातम्या:

‘भारत बंद’ला राज्यभरात प्रतिसाद, बुलडाण्यात रेल्वे अडवली, सर्व APMC मार्केट आणि आडत बंद

BHARAT BAND | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत! दिल्लीतील आजची स्थिती काय?

All routes to Delhi closed, good response to bharat band across the country