साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद, नितीश कुमार मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाचे किती मंत्री?

| Updated on: Nov 16, 2020 | 2:12 PM

साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद या फॉर्म्युलाने बिहारच्या मंत्रिमंडळात चारही पक्षांचे चेहरे असण्याची चिन्हं आहेत

साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद, नितीश कुमार मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाचे किती मंत्री?
Follow us on

पाटणा : जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जनादेश पाहता जेडीयूच्या मंत्र्यांची संख्या घटण्याची चिन्हं आहेत. तर एनडीएतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या वाट्याला अधिक मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. (Bihar CM Nitish Kumar Ministry Formula)

बिहारमध्ये सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या एनडीएमध्ये भाजप आणि जेडीयू यांच्यासोबत हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) हे दोन पक्षही आहेत. चार मित्रपक्षांमध्ये मंत्रिपदांच्या वाटणीसाठी सूत्र निश्चित झाले आहे. साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद या फॉर्म्युलाने चारही पक्षांचे चेहरे मंत्रिमंडळात असतील. विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

भाजप नेते सुशील कुमार मोदी यांची उपमुख्यमंत्रिपदावरुन गच्छंती झाली आहे. भाजपने तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्यास रेणू देवी यांचं नाव आघाडीवर आहे.

मंत्रिमंडळात किती मंत्री असणार?

243 सदस्यांच्या विधानसभेत संविधानिक प्रावधानानुसार 15 टक्के सदस्यांना मंत्रिपद देता येऊ शकते. त्यानुसार बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 36 मंत्री असतील. एनडीएनला विधानसभा निवडणुकीत 125 जागा मिळाल्या असून भाजपला सर्वाधिक म्हणजे 74 जागा आहेत. त्यापाठोपाठ जेडीयूला 43, तर हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी चार-चार जागा आहेत.

कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं?

साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जाते. त्यानुसार भाजपला सर्वाधिक म्हणजे 21 मंत्रिपदं मिळतील, तर जेडीयूच्या वाट्याला बारा मंत्रिपदं येण्याची चिन्हं आहेत. हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल. नितीश कुमार स्वतः मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार असल्याने जेडीयूतील अकरा नेत्यांना मंत्रिपदं मिळतील.

बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू कोट्यातील 14 मंत्री रिंगणात उतरले होते. त्यापैकी आठ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर सहा मंत्री विजयी झाले. नितीश सरकारमधील मंत्री असलेले बिजेंद्र यादव, श्रावणकुमार, बीमा भारती, नरेंद्र नारायण यादव, महेश्वर हजारी आणि मदन सहनी पुन्हा विधानसभेवर गेले. याशिवाय विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी यांनीही आपली जागा राखली. (Bihar CM Nitish Kumar Ministry Formula)


संबंधित बातम्या :

बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे 7-7 मंत्री, भाजपच्या खात्यात दोन उपमुख्यमंत्रिपदं

नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस

(Bihar CM Nitish Kumar Ministry Formula)