Bihar Election 2020: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 53.54 टक्के मतदान

| Updated on: Oct 28, 2020 | 8:51 PM

बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 71 मतदारसंघांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. | Bihar Election

Bihar Election 2020: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 53.54 टक्के मतदान
Follow us on

पाटणा: गेल्या काही दिवासांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. संध्याकाळी वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 53.54 टक्के झाल्याचे समोर आले. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 71 मतदारसंघांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 54.94 टक्के मतदान झाले होते. मात्र, कोरोनाचे सावट लक्षात घेता यंदा पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी समाधानकारक असल्याचे मानले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर्स अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच कोरोना रुग्ण आणि दिव्यांगांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. आता उर्वरित दोन टप्प्यांतील मतदान अनुक्रमे 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला पार पडेल. यानंतर 10 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

दरम्यान, पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु असतानाच आज बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटण्यात प्रचारसभा घेतल्या. तर वाल्मिकीनगर आणि कुशेश्वर येथे राहुल गांधींच्या सभा पार पडल्या.

भाजपकडून राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
राहुल गांधी यांनी सकाळी मतदानाला सुरुवात होताना एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी मतदारांना न्याय, रोजगार आणि शेतकरी-कामगारांसाठी महाआघाडीला मतदान करण्याची मागणी केली. ‘इस बार न्याय, रोजगार, किसार-मजदूर के लिए आपका वोट सिर्फ महागठबंधन के लिए. बिहार के पहले चरण के मतदान की आप सभी को शुभकामनाएँ’ असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

मात्र, मतदानाच्यादिवशी एखाद्या पक्षाला मतदान करा असं सांगून राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

संबंधित बातम्या:

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदींना हरवू शकत नाही- राहुल गांधी

पुढच्या वेळी मोदी-नितीश कुमार आले तर त्यांना पकौडे खायला घाला, राहुल गांधींचा निशाणा

राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहिता भंगाचा भाजपचा आरोप

Bihar Election 2020 : तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज, बिहार निवडणुकीच्या मतदानाचे काही फोटो