सायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती; अपसिंगाच्या शेतकऱ्याला फडणवीसांसमोर अश्रू अनावर

| Updated on: Oct 20, 2020 | 12:39 PM

सायेब.. आभाळच फाटलं ओ... तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती... सायेब, आता तुम्हीच काय तरी करा...'' असा आर्त टाहो आपसिंगा गावच्या शेतकऱ्याने फोडला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही स्तब्ध झाले.

सायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती; अपसिंगाच्या शेतकऱ्याला फडणवीसांसमोर अश्रू अनावर
Follow us on

तुळजापूर: “कधी पाहिला नव्हता असा पाऊस झाला. या पावसानं आमच्या घरांची पडझड झाली. जनावरं वाहून गेली. शेतातली पिकंही उद्ध्वस्त झाली… आता कशाचा कशाचाच आधार राहिला नाही. आमच्याकडे कोणी फिरकत नाही. सायेब.. आभाळच फाटलं की ओ… तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती… सायेब, आता तुम्हीच काय तरी करा…” असा आर्त टाहो आपसिंगा गावच्या शेतकऱ्याने फोडला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही स्तब्ध झाले. शेतकऱ्यांची ही केविलवाणी अवस्था पाहून काय बोलावे या विचारात फडणवीस पडले. फडणवीस यांच्याप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या सर्वच पुढाऱ्यांची ही अवस्था झाली होती. (Devendra Fadnavis visits flood-hit osmanabad)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कालपासून अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. काल बारामतीतील शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी केल्यानंतर आज तुळजापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपसिंगा गावात फडणवीसांचा ताफा येताच शेतकरी भराभर त्यांच्या भोवती जमा झाले. कोण आपल्या उद्ध्वस्त झालेल्या शेताकडे या म्हणू लागला तर कोण आपलं जमीनदोस्त घर पाहण्याची विनंती करू लागला. तर, काही शेतकरी झालेल्या नुकसानाची माहिती देऊन मदत करण्याची विनंती करू लागले. एका शेतकऱ्यालाही फडणवीसांशी बोलताना अश्रू अनावर झाले. आता तुम्हीच काही तरी करा. तुम्ही आज असता तर काही तरी मदत झाली असती. माझं सगळं घर दूधावर होतं. आता जनावरच वाहू गेली. कसा जगू मी?, असा सवाल या शेतकऱ्याने करत धायमोकलून रडायला सुरुवात केली.

तर, दुसऱ्या शेतकऱ्याने शेतातील पिकं वाहून गेली. आता शेतात फक्त दगडगोटे उरले आहेत. काय खावं आम्ही. आता पाच वर्ष शेती ओस पडणार. कसं जगायचं?, असा सवाल करत या शेतकऱ्यानेही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवं होती. त्यामुळे फडणवीसही गहिवरून गेले. काही काळ स्तब्ध झाल्यानंतर त्यांनी या शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवत काळजी करू नका. मी तुमच्या सोबत आहे, असा धीर दिला. मुख्यमंत्र्यांकडे तुमची गाऱ्हाणी मांडणार असल्याचंही त्यांना सांगितलं. त्यांची निवेदन घेतली. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे किती झाले. शेतमालाचे किती नुकसान झालं. किती लोक बाधित आहेत, याची माहिती घेतली. (Devendra Fadnavis visits flood-hit osmanabad)

संबंधित बातम्या:

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची tv9 ला माहिती

फडणवीसांकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’!, जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

(Devendra Fadnavis visits flood-hit osmanabad)