Kangana Ranaut | पुढील सुनावणीपर्यंत कंगनाला अटक करू नये, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

| Updated on: Nov 24, 2020 | 4:59 PM

कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंडेलवर तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

Kangana Ranaut | पुढील सुनावणीपर्यंत कंगनाला अटक करू नये, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि रंगोली चंडेल यांच्या याचिकेवर मंगळवारी (24 नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सुनावणी घेऊन त्यांना 8 जानेवारीपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर, कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंडेलवर तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत (Bombay High Court on Kangana Ranaut’s plea).

कोर्टात कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी एफआयआर संदर्भात युक्तिवाद मांडतान ‘कंगना रनौत आणि रंगोली चंडेल कुठलेही वादग्रस्त भाष्य करणार नाही’, असे विधान केले. पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार असून, त्याआधी कंगनाला बहिणीसमवेत मुंबई पोलिसांसमोर हजर व्हायचे आहे. मात्र, यामुळे कंगना आणि तिच्या बहिणीला अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

कंगनाने ठोठावले हायकोर्टाचे दरवाजे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) 23 नोव्हेंबर वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, यावेळीही अनुपस्थितीत राहत कंगनाने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावत, वांद्रे पोलीस स्टेशनमधील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स (Third Summons) बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा ‘फायनल अल्टीमेटम’ असून, कंगना अनुपस्थितीत राहिल्याने तिला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती.

विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा या दोघींनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. यातील एका समन्सला उत्तर देताना त्यांनी घरात लग्न असल्याचे कारण दिले होते. तर दुसऱ्या समन्सला त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही (Bombay High Court on Kangana Ranaut’s plea).

कंगना विरोधात गुन्हा दाखल

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात कंगना विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

दिग्दर्शक साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

(Bombay High Court on Kangana Ranaut’s plea)