त्या तरुणाकडून जाणूनबुजून व्यत्यय, अरेरावीचा हेतू नव्हता, चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

| Updated on: Aug 13, 2019 | 7:57 AM

शिरोळमधील पूरग्रस्ताला झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एक तरुण वारंवार उठून व्यत्यय आणत होता. त्याला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो हेतूपुरस्सर व्यत्यय आणत होता, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

त्या तरुणाकडून जाणूनबुजून व्यत्यय, अरेरावीचा हेतू नव्हता, चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण
Follow us on

Chandrakant Patil कोल्हापूर : पूरग्रस्तांशी संवाद साधताना संयम सुटल्याने केलेल्या अरेरावीबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अरेरावी करण्याचा हेतू नव्हता, शिरोळमधील घटनेची वस्तुस्थिती समजून घ्या, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं. पूरग्रस्तांनी तक्रारी करण्यास सुरुवात केल्याने पाटील यांनी त्यांना झापलं होतं.

कोल्हापुरातील शिरोळमधील पूर परिस्थिती (Kolhapur Flood) बिकट असल्याने मी हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने पाच टन साहित्य घेऊन गेलो होतो. यावेळी शिरोळमधील काही मदत केंद्रांना भेटही दिली. एका मदत केंद्रावर भेट दिल्यानंतर पूरग्रस्तांना धीर देऊन प्रशासन करत असलेल्या कामांची माहिती दिली. त्याबरोबरच, नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. नुसत्या तक्रारी करुन काहीही होणार नाही. तुम्ही आवश्यक त्या सूचना करा, त्यावर आपण मार्ग काढू, अशी विनंती सर्व पूरग्रस्तांना केल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तक्रारी केल्याने काहीच साध्य होत नाही. उलट प्रशासनाचे मनोबल कमी होते. त्यामुळे तक्रारी न करता योग्य त्या सूचना कराव्यात. त्यावर आपण मार्ग काढू, असं आवाहनही मी केलं होतं. मात्र एक तरुण वारंवार उठून व्यत्यय आणत होता. त्याला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. प्रशासन आपणाला सर्व काही देणार असल्याचंही सांगितलं. पण तो हेतूपुरस्सर व्यत्यय आणत होता, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

‘तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’, चंद्रकांत पाटलांनी पूरग्रस्ताला झापलं!

ज्याप्रमाणे एखाद्या कार्यक्रमात वक्ता आपलं मत मांडत असताना, त्यामध्ये वारंवार कोणी व्यत्यय आणत असेल, तर त्याला शांत बसण्याचीच विनंती वक्ता करतो. तशीच विनंती केली होती. मात्र, त्या तरुणाचा हेतू स्वच्छ नसल्यानेच तो सातत्याने व्यत्यय आणत होता. कोणावरही अरेरावी करण्याचा किंवा उपमर्द करण्याचा माझा हेतू नव्हता, ही वस्तुस्थिती सर्वांनी समजून घ्यावी, असं कळकळीचं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

शिरोळ भागात पाणी भरल्याने अनेकांचं स्थलांतर केलं आहे. स्थलांतर केलेल्या एका शिबिरात चंद्रकांत पाटील पोहचले. त्यावेळी ते नागरिकांना घाबरु नका, सरकार पाठीशी आहे, असं सांगत होते.

“शिरोळमधून रोड सुरु झाला, तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपल्याला प्रार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता सरकार पाठीशी आहे याची खात्री बाळगा. हे सर्व आपण नीट करु. तक्रारी करुन काही होणार नाही, सूचना करा. प्रशासनाला तक्रारी करुन काय होणार”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील बोलत असताना खालून एक व्यक्ती तक्रारीच्या सुरात आपलं म्हणणं मांडत होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळं करु, सगळं करु…. त्यावेळी पुन्हा ती व्यत्यय आणू लागल्याने चंद्रकांत पाटलांचा संयम सुटला आणि ते ओरडले ए… गप्प.

महापुराने जनता हैराण

कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिक पुराने हैराण आहेत. दोन्ही जिल्ह्यांना आठवडाभरापासून पुराने वेढा दिला आहे. अनेकांनी आपले नातेवाईक गमावले आहेत, गुरं-ढोरं पाण्यात वाहून गेली आहेत. घरं बुडाल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत हतबल झालेल्या जनतेला सत्ताधाऱ्यांनी धीर देणं आवश्यक आहे. सर्व गमावलेले नागरिकांमध्ये संताप, क्रोध या भावना असणं साहजिक आहे. पण म्हणून पूरग्रस्तांनी राग व्यक्त केला, म्हणून त्यांना जशास तसं उत्तर देणं हे सत्ताधाऱ्यांना शोभणारे नाही.

संबंधित बातम्या  

…म्हणून चंद्रकांत पाटील यांची टीव्ही 9 च्या अँकरला मंत्रीपदाची ऑफर

सांगली : गिरीश महाजनांना ‘सेल्फी’ भोवला, पूरग्रस्तांचा राग अनावर  

कोल्हापूर : गिरीश महाजनांच्या सेल्फीवर मुख्यमंत्र्यांची पाठराखण  

सांगली : गिरीश महाजनांवर पूरग्रस्त संतापले, सरकारी हलगर्जीपणाचे वाभाडे काढले