मुंबई-ठाण्यात वीजेचा ब्रेकडाऊन होणं ही शरमेची बाब; माजी ऊर्जामंत्र्यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Oct 12, 2020 | 12:42 PM

महाराष्ट्रासारख्या आधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या राज्याच्यादृष्टीने इतक्या मोठ्याप्रमाणात तांत्रिक बिघाड होणे, ही दुर्दैवी बाब.

मुंबई-ठाण्यात वीजेचा ब्रेकडाऊन होणं ही शरमेची बाब; माजी ऊर्जामंत्र्यांचा सरकारवर हल्लाबोल
Follow us on

मुंबई: राज्यातील वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणा सतर्क न राहिल्यामुळेच मुंबई आणि लगतच्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. संबंधित यंत्रणांनी बिघाड वेळीच दुरुस्त करण्यात आला असता तर ही वेळ ओढावली नसती. महाराष्ट्रासारख्या आधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या राज्याच्यादृष्टीने इतक्या मोठ्याप्रमाणात तांत्रिक बिघाड होणे, ही दुर्दैवी बाब असल्याचे मत राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. (Chandrashekhar Bawankule criticize govt)


महापरेषणच्या 400KV कळवा पडघा GSI केंद्रात सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या काही तासांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे रेल्वेसेवा, कार्यालये आणि इतर दैनंदिन कामकाजांचा खोळंबा झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत करताना सरकारी यंत्रणेतील त्रुटींवर टीका केली.


मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या तीन वाहिन्या टप्प्याटप्याने ठप्प झाल्या. यापैकी कळवा- तळेगाव केंद्र गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. तर कळवा पडघा केंद्रात आज सकाळी सात वाजता बिघाड झाला. यानंतरही संबंधित यंत्रणांनी वेगाने हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे तिसरी वाहिनीही ठप्प झाली. ज्या ट्रान्समिशन कंपनीने आजपर्यंत 25 हजार किलोवॅटचे यशस्वीपणे ट्रान्समिशन केले त्यांच्याकडून अशी चूक घडते. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात वीजपुरवठा खंडित होणे, ही दुर्दैव गोष्ट असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामं ठप्प झाली आहे. मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या:

Power grid failure | पॉवर ग्रीड फेल्युअर म्हणजे काय? भारतात किती पॉवर ग्रीड? वाचा सर्व काही

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

(Chandrashekhar Bawankule criticize govt)