केंद्र सरकारकडून मिळणारे धान्य महाग, त्यात सवलत मिळावी : छगन भुजबळ

| Updated on: Apr 13, 2020 | 11:00 PM

राज्यातील सुमारे 5 कोटी सवलतीच्या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे (Chhagan Bhujbal on high prices of grains).

केंद्र सरकारकडून मिळणारे धान्य महाग, त्यात सवलत मिळावी : छगन भुजबळ
Follow us on

मुंबई : अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणारे अंत्योदय व बीपीएल योजनेच्या 7 कोटी लाभार्थीना 6 महिने पुरेल एवढं अन्नधान्य राज्याकडे उपलब्ध आहे. परंतु, राज्यातील सुमारे 5 कोटी सवलतीच्या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांनी केली आहे (Chhagan Bhujbal on high prices of grains). राज्य शासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 3 कोटी 50 लाख लोकांसाठी केंद्राकडून खरेदी केले जाणारे धान्य महाग असल्याचंही भुजबळ यांनी यावेळी नमूद केलं. तसेच त्यात सवलत मिळावी अशी मागणी केली.

केंद्र शासन व राज्य शासनतर्फे कोरोना साथरोगावर नियंत्रण मिळण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने देशातील प्रत्येक राज्यात अन्न पुरवठ्याबाबत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी आज (13 एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्स‍िंगद्वारे संवाद साधला. यावेळी छगन भूजबळ बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले, “लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर राज्यात शिवभोजन थाळीच्या माध्यमातून केवळ 5 रुपयात 1 लाख थाळींचे दररोज वितरण सुरु आहे. 5 हजार 500 अन्नछत्राच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण व नाष्टा विस्थापित मजूर, कामगारांना मोफत दिला जात आहे.”

हजारो अशासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्नदानाचे उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत, असे असले तरी हे सर्व पुरेसे नाही. केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत बसणारे 7 कोटी अंत्योदय व बीपीएल कार्डधारक राज्यात आहेत. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील 50 लाख लाभार्थीना राज्यशासनाने सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील 3 कोटी केशरी कार्डधारकांनाही स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय घेतल्याने 3 कोटी 50 लाख लोकांसाठी केंद्र शासनाकडून राज्यशासन धान्य खरेदी करणार आहे. त्यासाठी येणारा खर्च 300 कोटी इतका आहे. हा खर्च अत्यंत मोठा आहे. त्यामुळे राज्यातील 3 कोटी केशरी रेशन कार्डधारक आणि काहीही नाही अशा विस्थापित व बेघर 2 कोटी नागरिक अशा 5 कोटी नागरिकांसाठी केंद्र शासनाने मदत करण्याची गरज आहे, असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

केंद्र शासनामार्फत प्रत्येक नागरिकाला 1 किलो चनाडाळ किंवा तूरदाळ मोफत दिली जाणार आहे. ती येणाऱ्या काही दिवसात केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे, असंही यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितलं. देशातील प्रत्येक राज्यातील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि सचिव या व्हिडिओ कॉन्फरन्स‍िंगला उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्यावतीने नाशिक येथून छगन भुजबळ व मंत्रालयातून (मुंबई) अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंदारे उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2334, मुंबई-पुण्यासह कोठे किती रुग्ण?

आधी जितेंद्र आव्हाड, आता त्यांच्यासोबतचे 13 जण होम क्वारंटाईन

पिंपरीत मुलगा 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर, लॉकडाऊनमध्ये पोलिस पित्याचा संघर्ष

MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा, यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?

ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल

Chhagan Bhujbal on high prices of grains