कांद्याने वांदा केल्यानंतर आता मिरचीचा ठसका सर्वसामान्यांना बसणार, मिरचीचा भाव वधारण्याची शक्यता

| Updated on: Oct 31, 2020 | 4:13 PM

नंदुरबार सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा असून दरवर्षी मिरची पिकांवर येणाऱ्या रोगांमुळे दिवसेंदिवस उत्पादनात घट होत आहे (Chilli price will rise).

कांद्याने वांदा केल्यानंतर आता मिरचीचा ठसका सर्वसामान्यांना बसणार, मिरचीचा भाव वधारण्याची शक्यता
Follow us on

नंदुरबार : कांद्याने वांदा केल्यानंतर आता मिरचीचा ठसका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. राज्यातील प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी मिरचीचे उत्पादन प्रचंड घटणार असल्याने मिरचीला बाजारपेठेत तेजी राहणार आहे (Chilli price will rise).

नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी मिरचीच्या बहरलेल्या शेतांचे चित्र पाहण्यास मिळत असते. मात्र यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलं, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं (Chilli price will rise).

दुसरीकडे यावर्षी मिरचीवर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्याचा मिरचीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला. त्यामुळे मिरचीचं उत्पन्न कमी झालं आहे.

नंदुरबारचे मिरची उत्पादक शेतकरी माळी यांनी आपल्या तेरा एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली आहे. दरवर्षी त्यांना तीनशे क्विंटल मिरचीचे उत्पन्न होत असते. मात्र या वर्षी उत्पन्नात तब्बल 70 टक्के घट झाली आहे. शेतीसाठी त्यांनी टाकलेलं भांडवलदेखील निघणे अशक्य असल्याचे माळी सांगतात.

नंदुरबार सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा असून दरवर्षी मिरची पिकांवर येणाऱ्या रोगांमुळे दिवसेंदिवस उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठ आणि राज्य सरकार यांनी मिरची पिकांवर संशोधन करणारे केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

या वर्षी मिरचीचे उत्पादन घटणार असल्याने लाल मिरचीचे दर तेजीत असतील. त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसणार आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात मिरची उत्पादन घटणार आहे. मिरचीवर येणाऱ्या रोगांच्या संशोधनासाठी द्राक्ष आणि केळीप्रमाणे संशोधन केंद्र सुरु करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

हेही वाचा : रेल्वे सुरू करा, मंदिरे उघडा, श्रेयही तुम्हीच घ्या, हवं तर आम्ही ढोल वाजवून स्वागत करू: नांदगावकर