‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

| Updated on: Sep 23, 2020 | 9:19 PM

उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवण्याचीही मागणी केली (CM Uddhav Thackeray demand to reduce medical oxygen price).

वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
Follow us on

मुंबई : “माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोव्हिडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत आहोत. त्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या काळात मृत्यूदर आणि कोरोना संसर्गाचा दर कमी झालेला आपल्याला दिसेल,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवण्याचीही मागणी केली (CM Uddhav Thackeray demand to reduce medical oxygen price). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारुन ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील. कोव्हिडनंतर देखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत.” या बैठकीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू या राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभाग झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले , “पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरुन परत एकदा देशातील नागरिकांना संबोधन करुन कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे.”

“दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढवणार”

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत राज्य सरकार करत असलेल्या काही महत्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव्य घेतले जातात. रॅपिड एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली, तर दुसरा घेतलेला द्राव्य आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठवला जातो. औषधांची उपलब्धता ठेवली आहे. दररोज दीड लाखांपर्यंत चाचण्या वाढवण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

“राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलीआयसीयू व्यवस्था सुरु केली आहे. येणाऱ्या काळात याची उपयुक्तता पाहता सर्वराज्यात ही यंत्रणा उभारण्यात येईल. यातून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे ठरवण्यात आले आहे,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

ऑक्सिजन उत्पादन व वितरणावर नियंत्रण हवे

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या आहेत. आम्ही न थकता लढतो आहोत. आम्ही कदापि हरणार नाही. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता आहे. केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. तसेच वितरणाच्या बाबतीत देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे.”

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस पुरवठ्याचे नियोजनही करायला हवे, अशी मागणी केली. ते म्हणाले, “लस उत्पादन लवकरात लवकर व्हावे म्हणून ट्रायलची प्रक्रिया लवकर व्हावी. तसेच या लसीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.”

मुख्यमंत्र्यांकडून चष्म्याच्या सवयीचे उदाहरण देत मास्कविषयी जनजागृती

मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे साधे उदाहरण दिले. ते म्हणाले, “पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार. तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार, पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही.”

पंतप्रधानांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हे उदाहरण इतकं आवडले की त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात या उदाहरणाचा उल्लेख केला. तसेच पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असं सांगितलं.

हेही वाचा :

मजुरांचे लाडके नेते नरेंद्र मोदी, त्यांनी घालविली काँग्रेसची सत्तेची गादी, संसदेत नव्या विधेयकाचे आठवलेंकडून काव्यमय स्वागत

कलानगरचे पाणी ओसरते मुंबईचे का नाही?, आशिष शेलारांचा ठाकरेंना बोचरा सवाल

तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा

CM Uddhav Thackeray demand to reduce medical oxygen price