दिवाळीनंतर नववी ते बारावीच्या शाळा उघडा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

| Updated on: Nov 07, 2020 | 7:37 PM

जागतिक परिस्थिती बघता, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दिवाळीनंतर नववी ते बारावीच्या शाळा उघडा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Follow us on

मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा आदि उपस्थित होते. (CM uddhav Thackeray directs to Open ninth to twelfth schools after Diwali)

जागतिक परिस्थिती बघता, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की, ‘ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते. ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा’.

‘शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जे मुल आजारी आहे किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

‘शिक्षकांची तपासणी करणार’ – वर्षा गायकवाड
शाळा सुरू होण्यापुर्वी सर्व शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर चाचणी ही 17 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. तर 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींगदेखील होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. (CM uddhav Thackeray directs to Open ninth to twelfth schools after Diwali)

कसं असेल शाळेचं नियोजन?
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसवण्यात येईल. एक दिवसाआड वर्ग भरतील. विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावं. इतकंच नाही तर स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा असणार आहे. त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठिण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाइन वर्गांची सुविधा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शाळा टप्प्या-टप्प्यांने सुरू व्हाव्यात – बच्चु कडू
शाळा सुरू करतांना टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्या तसंच शाळा व्यवस्थित सुरू रहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तर शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एस.ओ.पी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकाऱ्याने टप्प्या टप्प्यांने शाळा सुरू करण्यात येतील असं अप्पर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी सांगितलं.

इतर बातम्या –

शाळांची दिवाळीची सुट्टी वाढवली, आता पाच दिवसांऐवजी 14 दिवस सुट्टी

Breaking | 2 ते 16 नोव्हेंबरपर्यत शाळांना सुट्टी, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

(CM uddhav Thackeray directs to Open ninth to twelfth schools after Diwali)