मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

| Updated on: Oct 20, 2020 | 11:23 AM

मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी 25 हजार रुपयांची तात्काळ मदत देण्याची मागणी केली होती. | Devendra Fadnavis

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
Follow us on

उस्मानाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला. मात्र, त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळाला का, असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले. यापूर्वी मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी 25 हजार रुपयांची तात्काळ मदत देण्याची मागणी केली होती. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही तशी मागणी केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वत:च केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची नामी संधी चालून आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis osmanabad visit to rain affected areas)

ते मंगळवारी उस्मानाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची परिस्थिती विषद केली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात एरवीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापणीला आलेली पिके आणि कापून ठेवलेली पिके दोन्ही पाण्यात भिजली. त्यामुळे पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांमध्ये गुरांना देण्यासाठी चाराही उरलेला नाही, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

पिकांच्या नुकसानीबरोबरच शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीमुळे खरवडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना माती आणून जमिनीची मशागत करण्यासाठी एकराला साधारण 50 हजाराचा खर्च येतो. त्यामुळे सरकारने आता या खरवडून गेलेल्या जमिनी पुन्हा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. त्यासाठी विशेष योजना आखावी लागेल. याशिवाय, अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत. शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पुरात वाहून गेली. या सगळ्याची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे.
आमच्या काळात मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामा म्हणून ग्राह्य धरले जात होते. राज्य सरकारने आताही तेच करावे. त्याआधारे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. यानंतर दीर्घकालीन मदतीचा निर्णय घ्यावा, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीस यांनी केंद्र सरकारने मदत द्यावी, अशी मागणी करणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही फटकारले. एरवी महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बरेच मतभेद आहेत. मात्र, केंद्राने मदत द्यावी, या मुद्द्यावर तिन्ही पक्ष एकमताने बोलतात. केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत नक्कीच देईल. पण राज्य सरकारने प्रथम आपण काय मदत देणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

संबंधित बातम्या:

Devendra Fadnavis Live : ‘राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच बोलतायत’

(Devendra Fadnavis osmanabad visit to rain affected areas)