पालघरमध्ये जमावाकडून तिघांची हत्या, आरोपींना कडक शिक्षा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

| Updated on: Apr 20, 2020 | 8:36 AM

पालघरमध्ये जमावाने केलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (CM Uddhav Thackeray on Palghar Mob lynching in lockdown)

पालघरमध्ये जमावाकडून तिघांची हत्या, आरोपींना कडक शिक्षा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
Follow us on

मुंबई : पालघरमध्ये चोरीच्या संशयातून तिघांच्या हत्येप्रकरणी शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे. ताब्यात घेतलेल्या 101 आरोपींच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (CM Uddhav Thackeray on Palghar Mob lynching in lockdown)

‘पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी दोन साधू, एक ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल.’ असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला, ते कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.

काय आहे प्रकरण?

गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते. दोन साधू नाशिकमधील त्र्यंबकेश्वरला निघाले होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत. (CM Uddhav Thackeray on Palghar Mob lynching in lockdown)