Monsoon Session | विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन महिनाभर लांबणीवर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Jun 10, 2020 | 5:04 PM

कोरोनाचे संकट पाहता पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची माहिती दिली. (CM Uddhav Thackeray On Monsoon Session) 

Monsoon Session | विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन महिनाभर लांबणीवर  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन जवळपास महिनाभर पुढे ढकललं आहे. येत्या 22 जून रोजी हे अधिवेशन घेतलं जाणार होतं. मात्र कोरोनाचे संकट पाहता हे अधिवेशन 3 ऑगस्टपासून घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची माहिती दिली. (CM Uddhav Thackeray On Monsoon Session)

“येत्या 22 जूनपासून विधीमंडळाचे अधिवेशन घेतलं जाणार होतं. त्या अधिवेशनाबद्दल कामकाज समितीची बैठक झाली. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर येत्या 22 जूनला अधिवेशन घेणं कठीण आहे. त्यामुळे ते पुढे 3 ऑगस्टला घेण्याचे ठरले आहे,” असे मुख्यमंत्री नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.

“तसेच नागरिकांनी कृपया बाहेर पडल्यावर अंतर ठेवा. कोरोनासोबत जगायचं शिकावं लागेल. स्वच्छता पाळा, निर्जंतुकीकरण पाळा,” असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला केले.

…तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल 

“महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच हळूहळू यात शिथीलता आणली जाईल. जगभरात कोरोनासोबत जगायला शिका, असं म्हटलं जातं, तसंच आपल्याला करावं लागेल. बाहेर पडून आरोग्यासाठी व्यायाम करायला सांगितले. पण पहिल्या दिवशीची गर्दी पाहून धाकधूक वाढली. मात्र, बाहेर आरोग्यासाठी पडायचं आहे, खराब करण्यासाठी नाही.

जर अशाचप्रकारे गर्दी होत राहिली तर निर्बंध लावावे लागतील, लॉकडाऊन करावं लागेल. मात्र, तशी वेळ येणार नाही, महाराष्ट्रातील जनता नियमांचं पालन करेल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांच्या पाठीशी सरकार

“निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळे तिकडे जाऊन आलो आहोत. नुकसान खूप झालं आहे. विशेषत: रायगड जिल्हा, रत्नागिरीतील दापोली, मंडणगण येथे मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरु आहेत. पंचनामे आल्यावर नुकसान किती झालं आहे याची माहिती मिळेल. त्यानंतर भरपाई दिली जाईल,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

“वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मदतीसाठी निकष बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निकष बदलण्यात आले आहेत. बदललेल्या निकषाप्रमाणे मदत घोषित करण्यात आली आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“मी जेव्हा रायगडमध्ये गेलो तेव्हा तात्काळ 100 कोटींची मदत जाहीर केली. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला 75 आणि 25 कोटींची मदत केली. मला विचारण्यात आलं होतं की, पॅकेज काय? मुळात पॅकेज हा शब्द चुकीचा आहे. कुणालाही आम्ही उघडू पडू देणार नाही. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना महाविकास आघाडीचं सरकार खंबीरपणाने मदत करेल,” असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्तांना (CM Uddhav Thackeray On Monsoon Session)  दिले.

“मुंबई लोकलची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी, त्यांची संख्या वाढण्यासाठी लोकल महत्त्वाची आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपण ही मागणी केली आहे,” असे मुख्यमंत्री लोकलच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले.

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही संघर्ष झालेला नाही. मंत्रिमंडळ राज्याच्या हिताचे निर्णय घेतं, तेथे कुणीही मारामाऱ्या करण्यासाठी येत नाही,” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

संबंधित बातम्या : 

भाजपचे नेते गेल्यानंतर 3 महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि शरद पवारांना बाहेर पडावंसं वाटलं : चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी दरडावलं