Pandharpur Wari | मी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Jun 28, 2020 | 4:01 PM

मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपूरला जाणार (CM Uddhav Thackeray on Pandharpur Wari) आहे.

Pandharpur Wari | मी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : “मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपूरला जाणार आहे. यावेळी मी विठूरायाकडे कोरोना संकट नष्ट करण्याचं आणि आरोग्यदायी समाजासाठी साकडं घालणार आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray on Pandharpur Wari)

“आषाढीची वारी ही परवा आहे, मी जाणार आहे. मी आषाढीला तुमचा सर्वांचा प्रतिनिधी, मुख्यमंत्री म्हणून नाही तो मान-बहुमान वेगळा, पण मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जातो आहे. त्याठिकाणी मी वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून पोहोचणार आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“वारकऱ्यांनो तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. ते आशीर्वाद घेऊन मी विठूरायाचे आशीर्वाद घ्यायला जाईन. मला खात्री आहे, जर तुम्ही मागे उभे राहिलात, तर आपली विठू माऊलीही माझ्या साकड्याला यश दिल्याशिवाय राहणार नाही. तुमचे आशीर्वाद मी मागत आहेत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“आषाढी एकादशीची परंपरा कित्येक वर्षापासूनची आहे. मी 2010 ला वारीत प्रत्यक्ष सहभागी न होता हेलिकॉप्टरने सहभागी झालो होतो. तेव्हा पांडूरंगाचे दर्शन घेतलं. मी विठ्ठल पाहिला, मंदिरात जाऊन नाही, पण अथांग पसरलेल्या वारकऱ्यांमध्ये मला विठ्ठलाचे विश्वरुप दिसलं. वारकऱ्यांनी सयंम दाखवला आणि नाईलाज म्हणून वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागला,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“मी आपल्या वतीने आपल्या विठूरायाला साकडं घालायला जाणार आहे, मी विठूरायाला साकडं घालणार की, हे काय आहे, कोणते दिवस आहे. कोणती परिस्थिती आहे. लाखो भक्त तुझ्या दर्शनाविना घरातच आहे. तुझे अनेक चमत्कार आम्ही ऐकले आहेत. पण आता हा आणखी एक चमत्कार दाखवं आणि हे कोरोनाचे संकट नष्ट करुन केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगाला सुखाचे, समृद्धीचे आणि निरोगी आयुष्याचे दिवस दाखवं, हे साकडं घालायला मी जाणार आहे,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दहीहंडी उत्सव रद्द केल्याबद्धल आभार

कोणतीही चर्चा न करता स्वतःहून सामाजिक भान राखत दहीहंडीचा उत्सव रद्द करणाऱ्या मंडळांचेही आभार मानले.  सर्वधर्मियांनी आतापर्यंत अतिशय साधेपणाने सण साजरे केले आहेत. कारण आपण हे सामाजिक भान पाळले नाही तर संकटाचे दार आपोआप उघडणार आहे. त्यामुळे हे सामाजिक भान आपल्याला जपावेच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गणेश मूर्ती ४ फूट उंचीची

“सर्व गणेशमंडळांनीही एकसुरात सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मोठ्या 20/22 फूट ऊंचीच्या मूर्ती स्थापित करण्याची आजची परिस्थिती नाही. कारण मूर्ती हलवताना जास्त माणसे लागू शकतात. ते आजच्या परिस्थितीत शक्य नाही. म्हणून 4 फूट उंचीपर्यंतची मूर्ती यावर्षी स्थापित करण्याचे सांगण्यात आले आहे. गणेश आगमन आणि विसर्जनाची मिरणवूक काढता येणार नाही. मग उत्सव नेमका कसा साजरा करायचा, यावर चर्चा करून फक्त परंपरा कशी जपता येईल, यादृष्टीने लवकरच निर्णय कळवू,” असेही ते म्हणाले.

“विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने राज्य कोरोनामुक्त करुया, आपण ठरवलं तर ते नक्की करु शकतो असे  ते म्हणाले. आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे यासारखे जनजागृतीचे कार्यक्रम आखून आपण हा उत्सव साजरा करु,” असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray on Pandharpur Wari)

संबंधित बातम्या : 

कोरोनामुक्त झालेल्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे