केंद्राच्या सहकार्यानं महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना घरापर्यंत पोहोचवू, उद्धव ठाकरेंचा शब्द

| Updated on: Apr 19, 2020 | 2:00 PM

घरी जाल तेव्हा आनंदाने जा, भीत भीत नको. काही दिवसांचाच तर सवाल आहे, हेही दिवस जातील, असं उद्धव ठाकरे स्थलांतरित मजुरांना म्हणाले. (Uddhav Thackeray on migrant workers in Maharashtra)

केंद्राच्या सहकार्यानं महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना घरापर्यंत पोहोचवू, उद्धव ठाकरेंचा शब्द
Follow us on

मुंबई : केंद्राच्या सहकार्याने महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपापल्या घरापर्यंत पोहोचवण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. परंतु 3 मेपर्यंत देशात कुठलीच रेल्वे किंवा विमान सेवा सुरु होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. (Uddhav Thackeray on migrant workers in Maharashtra)

स्वातंत्र्य आणि मोकळेपण देण्यास सरकार अनुकूल आहे. मात्र सद्यस्थितीत बंधनाशिवाय पर्याय नाही. स्थलांतरित मजूर आता शांत झाले आहेत. मजुरांसंबंधी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरु आहे. लवकरच केंद्राशी बोलून निर्णय होईल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरित मजुरांना आश्वस्त केले.

महाराष्ट्र सरकार तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवेल. घरी जाल तेव्हा आनंदाने जा, भीत भीत नको. काही दिवसांचाच तर सवाल आहे, हेही दिवस जातील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : मी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार, लहान मुलांनी काळजी करु नका : मुख्यमंत्री

दरम्यान, 3 मेपर्यंत राज्यात धार्मिक, सांस्कृतिक किंवा कोणतेही जाहीर कार्यक्रम होणार नाहीत. वर्तमानपत्र घरपोच पाठवले जाणार नाहीत. वृत्तपत्रांसंबंधीचा निर्णय संपादकांशी बोलूनच होईल. वृत्तपत्रांसाठी 2-3 दिवसांनंतर मुंबई-पुणे वगळता निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

घरगुती हिंसाचार, अत्याचार किंवा मानसिक छळ सहन करावा लागणाऱ्या महिलांना मदतीसाठी 100 हा हेल्पलाइन नंबर असल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

मदतीसाठी आणखी दोन हेल्पलाइन नंबर

मुंबई महापालिका आणि बिर्ला – 1800 1208 200 50

आदिवासी विभाग- 1800 102 4040
आदिवासी विभागासोबत प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्लही सहभागी

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे

काही निर्णय घेताना माझं कौतुक होतं आहे, तर काही जण मला वाईट बोलतात, पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. कारण मला राज्यावर आलेले संकट संपावयाचं आहे. मुंबई पुण्यात कोरोना रुग्ण वाढणे हे धोकादायक आहे. मला कोणत्याही प्रकाराचा धोका पत्करायचा नाही,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on migrant workers in Maharashtra)

“ज्या बालगोपाळांनी आपल्या वाढदिवसाचे किंवा खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले, त्यांचे कौतुक, तुम्ही काळजी करु नका, सरकार खंबीर आहे, चिमुरड्यांनी आपले पैसे स्वतःजवळच ठेवावे,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षण दिसत असले तर ती लपवू नका. फिव्हर क्लिनीकमध्ये जा. जर लक्षण दिसत असतील तर लोक वाळीत टाकतील का? असा प्रवृत्तीचा महाराष्ट्र नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले.

“पीपीई किटचा थोडासा तुटवडा आहे. मी खोटं बोलणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार पीपीई किट देत आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“ऑरेज रेशन कार्ड असणाऱ्यांना सवलतीत अन्नधान्य देत आहोत. केंद्र मोफत धान्य देत आहे, मात्र आतापर्यंत त्यांनी फक्त तांदूळ दिले, तेही अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत येणाऱ्या जनतेसाठी. त्यामुळे आम्ही गहू आणि डाळीचीही मागणी केली आहे. डाळी आणि गहू आल्यानंतर ताबडतोब पुरवठा सुरु करु,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

“काही ठिकाणी आपण माफक स्वरुपात सवलत देत आहोत. काही जिल्ह्यात शून्य रुग्ण आहेत. त्यामुळे आपण रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन केले आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपण उद्योगांना सुरुवात करु शकतो. जर तुम्ही तुमच्या मजूरांची काळजी घेत असाल, तर आम्ही सर्व पुरवठा करु. मालवाहतूक करु व्हायरस वाहतूक नको. जिल्ह्यातील जिल्ह्यात तुम्ही ये-जा करु शकता. पण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात येऊ शकत नाही.” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“उद्या आपण सहा आठवडे पूर्ण करु. मी नम्रपणे काही माहिती सांगतो आहे. आता हा आकडा पुढे सरकतो आहे. हा टेस्टचा आकडा आहे.  काल संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात 66 हजार 796 टेस्ट झाल्या. यात 95 टक्के निगेटिव्ह आल्या आहेत. या टेस्टनंतर 3600 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 350 रुग्णांना बरं करुन घरी सोडलं आहे. 70 ते 75 टक्के रुग्ण सौम्य किंवा लक्षण नसलेले आहेत” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray on migrant workers in Maharashtra