धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

| Updated on: Nov 08, 2020 | 2:58 PM

दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. (uddhav thackeray on reopening religious places)

धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Follow us on

मुंबई: राज्यातील धार्मिकस्थळं दिवाळीनंतर उघडणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मंदिरं उघडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर गंडांतर येऊ नये म्हणून सावध पावलं टाकत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (uddhav thackeray on reopening religious places)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी दीर्घ संवाद साधला. तब्बल 33 मिनिटाच्या या फेसबुक संवादातून त्यांनी राज्यातील अनेक प्रश्नांवर मतं मांडली. तसेच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मंदिराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. मंदिरं कधी उघडणार असं मला गेल्या महिन्यांपासून विचारलं जात आहे. मंदिरं उघडणार ना. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर नियमावली करू. त्यानंतर मंदिर उघडली जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

धार्मिकस्थळं उघडण्याची नियमावली सोपी आहे. मंदिरात जातानाही तोंडाला मास्क लावूनच जायचं आणि मंदिरात कमीत कमी गर्दी करायची हीच नियमावली आहे, असंही ते म्हणाले.

साधारणपणे घरातील आजी-आजोबा आदी ज्येष्ठ नागरिक मंदिरात जात असतात. कोरोनाच्या संकटामुळे त्यांना आपण आतापर्यंत जपत आलो आहोत. त्यांच्या काळजीपोटीच धार्मिकस्थळं उघडण्यात थोडा उशीर होत आहे. पण तरीही माझ्यावर टीका होत आहे. पण तुमच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी मला त्याची पर्वा नाही. हा वाईटपणा घ्यायला मी तयार आहे. पण उद्या जर तुमच्यावर गडांतर आलं तर टीका करणारे पुढे येणार नाहीत. तुमचं तुम्ही बघा. आम्ही तर तुम्हाला सांगितलंच होतं, असं हेच लोक म्हणतील. म्हणून मी सावध पावलं टाकत आहे, असंही ते म्हणाले.

घराच्या आजूबाजूला फटाके वाजवा, सार्वजनिक ठिकाणी नको

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचे का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नागरिकांनी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला फटाके जरुर वाजवावेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवू नयेत, असंही त्यांनी निक्षून सांगितलं. (uddhav thackeray on reopening religious places)

संबंधित बातम्या:

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही, पण फटाक्यांच्या धुराने कोरोना वाढू शकतो, आतापर्यंतची मेहनत वाया जाईल: मुख्यमंत्री

Live Update : मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; टीकेची पर्वा न करता कामं करणारच; मुख्यमंत्र्यांचा निर्धार