संकट मोठं, समजुतदारपणा वाढवा, मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती

| Updated on: Mar 24, 2020 | 7:01 PM

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे (CM Uddhav Thackeray on Corona Crisis). कोरोनाविरोधातील या लढाईत नागरिकांनी आणखी समजुतदारपणा वाढवावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

संकट मोठं, समजुतदारपणा वाढवा, मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे (CM Uddhav Thackeray on Corona Crisis). कोरोनाविरोधातील या लढाईत नागरिकांनी आणखी समजुतदारपणा वाढवावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक सूचना दिल्या (CM Uddhav Thackeray on Corona Crisis).

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“आपण सर्वांनी समजूतदारपणा वाढवला पाहिजे. या संकटाचं गांभीर्य आपल्या लक्षात आलेलं आहे. उगाच हे बंद ते बंद किंवा हे कोरोना ते कोरोना असं नाही. हे संकटच तेवढं मोठं आहे. हा विषाणू जिथे पोहोचलेला नाही तिथे पोहोचू द्यायचा नाही आणि जिथे प्रादूर्भाव झाला आहे तिकडेच त्याला संपवायचा आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“सर्वच जिल्ह्याच्या सीमा आपण बंद केल्या आहेत. मग अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, जीवनाश्मक वस्तू पुरवणारी आमची संस्था आहे. आम्हालाही अडवलं जात आहे. हे होता कामा नये. ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर यांचं शेतावर येणं-जाणं आपण बंद केलेलं नाही. कृषी संबंधित अन्नधान्याची वाहतूक आपण थांबवलेली नाही. शहरांमध्ये जीवनाश्मक वस्तूंची ने-आण करणाऱ्यांची वाहतूक थांबवलेली नाही. पण ज्या कंपन्या उत्पादन निर्माण करतात त्यांनी आपल्या वाहनांवर कंपनीचं नाव आणि जे काही कर्मचारी असतील त्यांच्याजवळ ओळखपत्र द्यावीत”, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

“पोलिसांना सांगतो, आपण आपलं जगणं नाही थांबवलं. फक्त अधिक जगण्यासाठी आपली जगण्याची शैली बदलली आहे. सकाळ झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला धान्य, भाजी आणि औषधी घेण्यासाठी बाहेर पडावं लागतं. आपणही समजूतीने घ्या. अनेक ठिकाणी नागरिक जीवनाश्मक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडत असतील तर खात्री करुन घ्या. नागरिकांनाही सांगतो, नुसता फेरफटका मारायला घराबाहेर पडू नका, घरात राहा आणि सुरक्षित राहा”, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

“जिथे जीवनाश्मक वस्तू किंवा वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांना वाहतुकीस अडचण येत असेल तिथूनच त्यांनी पोलिसांना 100 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. पोलीस पूर्णपणे सहकार्य करतील आणि ही वाहतूक थांबू न देता जिथे आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत मदत केली जाईल”, अशी ग्वावी उद्धव ठाकरे यांनी दिली.

“मला पोलिसांचं कौतुक आणि धन्यवाद म्हणायचं आहे. काही लाख मास्क त्यांनी धाड टाकून जप्त केले आहेत. ही अशीच कामगरी आपल्याकडून अपेक्षित आहे. या संकटाचा कुणीही संधी म्हणून उपयोग करु नये. काळाबाजार होता कामा नये. साठेबाजी होता कामा नये. राज्याच्या अन्नपुरवठा साठाबाबत बैठक घेतली. काळजी करु नका, पुरेसा साठा आहे. फक्त पुरेसी वाहतूक होणे जरुरीची आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.