राज्यात युती असली तरी औरंगाबादेत काँग्रेस स्वबळावर लढणार – अमित देशमुख

| Updated on: Oct 15, 2020 | 3:43 PM

काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचाही पक्षाने निवडणूक स्वबळावर लढावी, असा आग्रह आहे. आम्ही त्यांच्या मताचा आदर करायचे ठरवले आहे. | Congress Aurangabad mahanagarpalika election

राज्यात युती असली तरी औरंगाबादेत काँग्रेस स्वबळावर लढणार - अमित देशमुख
Follow us on

औरंगाबाद: राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसकडून औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे. काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. महाविकास आघाडीतील पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिल्यापासून स्वतंत्रपणे लढतात. त्यामुळे काँग्रेस औरंगाबाद महानगरपालिकेची आगामी निवडणुकही स्वबळावर लढेल, असे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. (Congress will fight Aurangabad mahanagarpalika election alone)

काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचाही पक्षाने निवडणूक स्वबळावर लढावी, असा आग्रह आहे. आम्ही त्यांच्या मताचा आदर करायचे ठरवले आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने परिस्थिती सामान्य होऊ शकते. यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल.

कोरोनापूर्वी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने भाजपने जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि छोटेखानी कार्यक्रमांसाठी औरंगाबादचे दौरे केले होते. त्यावेळी भाजपकडून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा तापवण्याचा प्रयत्नही झाला होता.

दरम्यान, आता काँग्रेसच्या या निर्णयामुळे आगामी काळात महाविकासआघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढवणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील कुरबुरी अधूनमधून डोके वर काढत असतात. परंतु, वरिष्ठ नेत्यांमधील समन्वयामुळे आतापर्यंत महाविकासआघाडीचे गाडे सुरळीत चालले आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्यास नवे वाद निर्माण होऊ शकतात. याशिवाय, गेल्या काही काळातील भाजपची वाढती ताकद पाहता मुंबई, नवी मुंबई, ठाणे या महानगरपालिकांमधील सत्ता कायम राखण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. मात्र, आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे या सगळ्याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

संबंधित बातम्या:

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील

रश्मी ठाकरेंच्या पहिल्याच ‘सामना’ अग्रलेखात भाजपवर हल्लाबोल

… तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

‘औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा’ भाजप नगरसेवकांचे काळे कपडे घालून सभागृहात प्रवेश

(Congress will fight Aurangabad mahanagarpalika election alone)