गुण जुळतीलही, पण मार्क्सचं काय? कराडमधील दाम्पत्याला 12 वीत समान गुण

| Updated on: Jul 18, 2020 | 3:57 PM

बारावीची परीक्षा दिलेल्या दाम्पत्याला समान गुण मिळाले आहेत. लग्नाच्या कुंडलित गुण जुळले, आता गुणपत्रिकाही जुळली. (Karad couple gets same marks in HSC)

गुण जुळतीलही, पण मार्क्सचं काय? कराडमधील दाम्पत्याला 12 वीत समान गुण
Follow us on

सातारा : गुण जुळतीलही पण स्वभावाचं काय, अशी मॅट्रिमोनी वेबसाईटची जाहिरात आपल्याला टीव्हीवर नेहमी दिसते. पण आता गुण जुळतीलही पण मार्क्सचं काय, असा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर हो आलं तर? ही आश्चर्यकारक घटना कराडमध्ये घडली आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या दाम्पत्याला समान गुण मिळाले आहेत. (Karad couple gets same marks in HSC)

लग्नपत्रिकेत 36 पैकी 23 गुण जुळलेल्या या दाम्पत्याला 12 वी परीक्षेतही समान गुण मिळाल्याचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम आणि सांगवड येथील किरण सूर्यवंशी यांचा प्रेमविवाह घरच्यांच्या संमतीने झाला. मे महिन्यातच लॉकडाऊनमध्ये दोघांचं लग्न झालं. त्याअगोदर दोघांनीही बारावी परीक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस तर अधिकने आर्ट्समधून परीक्षा दिली. (Karad couple gets same marks in HSC)

अधिक हा पदवीधर असून किरणला प्रोत्साहन मिळावे यासाठी त्याने बारावीची परीक्षा दिली होती. 12 वीच्या निकालामध्ये दोघांनाही 650 पैकी 323 मार्क्स मिळाले. दोघांची टक्केवारी ही 49.69 अशी समान आली आहे.

परीक्षअगोदर लग्नाला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता. तेव्हा निराश मनस्थितीत दोघेही अभ्यास करत होते. अशा परिस्थितीत हे दोघे एकमेकांना माझ्यापेक्षा तुला जास्त मार्क्स मिळतील असं म्हणत होते. मात्र प्रत्यक्षात निकाल समान आल्याने दोघांनाही आपली जोडी परफेक्ट आणि एकमेकांसाठीच असल्याची तीव्र जाणीव झाली. किरणने मार्च महिन्यातच 18 वर्षे पूर्ण केली आहेत. तर अधिकचंही वय 21 वर्षे पूर्ण आहेत.

मे महिन्यात लॉकडाऊनमध्ये दोघांचे लग्न घरच्यांच्या संमतीने साध्या पद्धतीने पार पडलं. लग्नाचे गुणोमिलनात दोघांचे 23 गुण जुळले होते. लग्नात गुण जुळले, परीक्षेत जुळले, आता वैवाहिक जीवनातही सर्व स्वप्न, आवडी-निवडी जुळाव्यात ही अपेक्षा किरण आणि अधिक या नवदाम्पत्यांने व्यक्त केली आहे.

दुसरीकडे मुलीच्या वडिलांनी “बारावी परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्याने नाराज होतो मात्र लेक आणि जावई यांच्या समान गुणांचा योगायोग पाहून समाधान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया दिली.

गुणोमिलनाचे गुण, परीक्षेतील मार्क हा आकड्यांचा खेळ असला, तरी नवजीवनाची सुरुवात करणाऱ्या नवदाम्पत्याला हे जुळलेले गुण आयुष्यभर ऊर्जा देण्यास पुरेसे ठरतील हे नक्की.