भारतात आता 26/11 सारखे दहशतवादी हल्ले होऊ शकत नाहीत; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना विश्वास

| Updated on: Nov 27, 2020 | 7:08 AM

भारतात आता 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासारख्या घटना घडू शकत नाही, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.

भारतात आता 26/11 सारखे दहशतवादी हल्ले होऊ शकत नाहीत; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना विश्वास
Follow us on

नवी दिल्ली : भारतात आता 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासारख्या (26/11 Mumbai terror attack) घटना घडू शकत नाही, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, देशाचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण (National Security Policy) अशा प्रकारे तयार केले गेले आहे की देशात कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला होणे अशक्य आहे. हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट कार्यक्रमात सिंह बोलत होते. (Defence Minister Rajnath Singh says Terrorist attacks like 26/11 not possible again in India)

संरक्षणमंत्री म्हणाले की, आपल्याला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची घटना कधीही विसरता येणार नाही, कारण तेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यात आले होते, परंतु आम्ही देशवासियांना हमी देतो की, यापुढे भारतात अशा प्रकारचा कोणताही हल्ला होणे शक्य नाही.

नगरोटा हल्ल्याचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की, सुरक्षा दलांनी मोठा कट उधळून लावला आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला (26/11 Mumbai terror attack) केला होता. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला गुरुवारी 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.

सिंह म्हणाले की, भारताकडून दहशतवादाविरोधात 360 डिग्री कारवाई केली जात आहे. भारत आता केवळ स्वतःच्या सीमेतच नाही तर गरज असेल तेव्हा आपले शूर जवान सीमा पार करुन दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करत आहेत. गेल्या 12 वर्षांमध्ये आम्ही भारतात अस्तित्वात असलेल्या दहशतवाद्यांशी संबंधित प्रत्येक गोष्ट उध्वस्त केली आहे. आता दहशतवाद्यांचे आर्थिक जाळे उध्वस्त करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत.

भारत-चीन सीमेवरील तणावाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारताला युद्ध नको आहे, परंतु कोणीही भारताच्या एक इंच जमिनीकडेही पाहू नये. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही. कोणत्याही देशाची इंचभर जमीन भारताने बळकावलेली नाही. भारताला कोणत्याही प्रकारचे युद्ध नको आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या युद्धासाठी आपण सज्ज असणं आवश्यक आहे.

दरम्यान, मुंबई हल्ल्याला गुरुवारी 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे आदरांजली वाहिली.

26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईतल्या 10 ठिकाणी दहशतवादी हल्ले

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात हल्ले झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट घडवून आणला होता.

संबंधित बातम्या

POK भारताचा भाग होता, आहे आणि राहील; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावले

पुलवामा हल्ल्याची पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली, आता काँग्रेसची नेत्यांची बोलती बंद का? राजनाथ सिंहांचा सवाल

(Defence Minister Rajnath Singh says Terrorist attacks like 26/11 not possible again in India)