आता पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका: उद्धव ठाकरे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

अमरावती: आता टीका करायची कोणावर हा प्रश्न आहे, कारण आज टीका करायची आणि उद्या तेच शिवसेनेत नाहीतर भाजपमध्ये दिसायचे. आता शरद पवार यांच्यावर टीका करायची की नाही हे कळत नाही, त्यांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका, अशी मिश्किल टिपण्णी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना-भाजप युतीचा पहिला एकत्र पदाधिकारी मेळावा अमरावतीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री […]

आता पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका: उद्धव ठाकरे
Follow us on

अमरावती: आता टीका करायची कोणावर हा प्रश्न आहे, कारण आज टीका करायची आणि उद्या तेच शिवसेनेत नाहीतर भाजपमध्ये दिसायचे. आता शरद पवार यांच्यावर टीका करायची की नाही हे कळत नाही, त्यांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका, अशी मिश्किल टिपण्णी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना-भाजप युतीचा पहिला एकत्र पदाधिकारी मेळावा अमरावतीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजप युती हा फेव्हिकॉलचा जोड आहे, तुटणार नाही, असं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात मुंबई पूल दुर्घटनेचा उल्लेख करतील अशी आशा होती. मात्र त्यांनी सर्व भाषण राजकारणावर केंद्रीत केलं.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरुन उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला.

“आता टीका करायची कोणावर हा प्रश्न आहे कारण आज टीका करायची आणि उद्या तेच सेनेत नाहीतर भाजप मध्ये दिसायचे. पवारांवर टीका करायची की नाही हे कळत नाही, मात्र त्यांना भाजपमध्ये घेऊ नका”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

15-20 दिवस झाले काय बोलायचं कळत नव्हतं. शिवसेना-भाजपकडून उघड तलवारी काढल्या होत्या, काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या विसरा आणि आता खऱ्या तलवारी काढून मैदानात उतारा. आमच्यात जो संघर्ष झाला तो आम्ही विकासाच्या आणि राज्याच्या आड येऊ दिला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना मी नरेंद्र भाई म्हणतो करण त्यांच्यावर मला गर्व आहे. कोणाला वाटेल मी असं कसं बोललो, पण त्यांनी जनतेसाठी, सामान्य माणसाच्या हिताचं काम केलं. भाजप-शिवसेना ही जनतेचा आधार आहे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

आमच्यात झालेला संघर्ष विसरु नका मात्र तो संघर्ष बघा जेव्हा देशासाठी बाळासाहेब आणि अटलजींनी केला तो मोठा संघर्ष आहे. आधीच्या काळात आमच्यासोबत येत कोण होतं? आम्हाला धर्मवादी म्हणायचे मात्र आमच्या मागच्या पिढीने जो संघर्ष केला, त्यामुळे आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो, असं उद्धव यांनी सांगितलं.

ज्या योजना जनतेच्या हिताच्या आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा हेच महत्वाचं आहे. आमच्या भाषणांपेक्षा जनतेला दोघांना एका मंचावर बघायचं होतं ते झालं. युती झाली नसती तर काय झालं असत? ऐटीत चालणारे त्याचा फायदा घेत होते आणि राज्यकर्ते झाले असते, असं उद्धव म्हणाले.

आता जे करायचं ते मनापासून करायचं. कोणी गद्दारी करणार नाही. आता भाजप सेना विसरा भगवा बघा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

बाळासाहेबांनी हे आज दिसत असलेलं वैभव बघितलं असतं तर त्यांना आनंद झाला असता, असं भावनिक उद्गार उद्धव यांनी काढले.

बाळासाहेब ठाकरेंनी जी पहिली सभा घेतली, ती शिवाजी पार्कवर. तसंच आपल्याला करायचं आहे. आपल्या 48 जागा सुद्धा कमी पडतील असं काही करायचं आहे. एकही जागा दुसऱ्याला मिळता कामा नये, असं उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं.