केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन WHO च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होणार

| Updated on: May 20, 2020 | 11:25 AM

डॉ. हर्षवर्धन हे जपानच्या डॉ. हिरोकी नाकातानी यांच्याकडून 22 मे रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. (Dr Harsh Vardhan World Health Organization Executive Board Chairman)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन WHO च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होणार
Follow us on

नवी दिल्ली : ‘कोरोना’विरुद्ध भारताच्या लढ्याचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. भारताने फक्त देशातच ‘कोरोना’ रोखण्यासाठी मोठी पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण जगालाही मदत केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे पुढील अध्यक्ष असतील. (Dr Harsh Vardhan WHO World Health Organization Executive Board Chairman)

सध्या जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद भूषवतात. डॉ. हर्षवर्धन हे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्याकडून 22 मे रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

194 देशांच्या जागतिक आरोग्य महासभेने मंगळवारी भारताला कार्यकारी मंडळावर नेमण्याच्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. भारत तीन वर्षांच्या मुदतीसाठी कार्यकारी मंडळावर निवडला जाईल, असा निर्णय WHO च्या आग्नेय आशिया समूहाने गेल्या वर्षी एकमताने घेतला होता.

हेही वाचा : ‘कोरोना’ संकटात ‘WHO’ने काय-काय केलं? भारतासह 62 देशांकडून चौकशीची मागणी

22 मे रोजी होणार्‍या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हर्षवर्धन यांची औपचारिक निवड केली जाईल. प्रादेशिक गटातील अध्यक्षपद प्रत्येकी एक वर्षासाठी फिरते (रोटेशन) राहणार आहे. पहिल्या वर्षी भारताचा उमेदवार कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष असेल, असा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता.

कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद हे पूर्णवेळ काम नाही. कार्यकारी मंडळामध्ये आरोग्य क्षेत्रात ठसा उमटवणारे विविध देशांचे 34 सदस्य आहेत. वर्षातून कमीत कमी दोनवेळा मंडळाची बैठक होते. मुख्य बैठक सहसा जानेवारीत होते. आरोग्य सभेनंतर लगेचच मेमध्ये दुसरी बैठक आयोजित केली जाते. कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांचे मुख्य कार्य म्हणजे हेल्थ असेंब्लीच्या निर्णय आणि धोरणांवर सल्ला देणे.

सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 73 व्या जागतिक आरोग्य संमेलनाला संबोधित करताना हर्ष वर्धन म्हणाले होते की, कोविड19 साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने वेळीच आवश्यक ती पावले उचलली आहेत. देशाने या आजाराशी निगडीत चांगली कामगिरी केल्याचा दावाही त्यांनी केला होता. येत्या काही महिन्यांत आणखी चांगल्या कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Dr Harsh Vardhan WHO World Health Organization Executive Board Chairman)