पावसामुळे ऐन नवरात्रीत फुलं खराब, विक्री होत नसल्याने फुलं रस्त्यावर फेकण्याची वेळ

परतीच्या पावसाने फुलशेतीला मोठा फटका बसला आहे (Florists throw flowers at Kalyan APMC).

पावसामुळे ऐन नवरात्रीत फुलं खराब, विक्री होत नसल्याने फुलं रस्त्यावर फेकण्याची वेळ
| Updated on: Oct 19, 2020 | 4:25 PM

ठाणे : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या फूल बाजारात पावसामुळे फूलं खराब होत आहेत. त्यात फुलांना ग्राहक नसल्याने बाजारात फुलांचा माल सडत आहे. त्यामुळे फूल विक्रेत्यांवर फुलांचा माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे (Florists throw flowers at Kalyan APMC).

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून फूल बाजार बंद होता. त्यावेळी भाजीपाला मार्केट सूरु होते. फूल बाजार अत्यावश्यक सेवेत मोडत नसल्याने फूल बाजार बंद होता. अनलॉकच्या प्रक्रियेत फूल बाजार सुरु झाला. त्यावेळी फूल मार्केटमधील विक्रेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.

नवरात्र आणि दसऱ्याला झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळतो. मात्र, परतीच्या पावसाने फुलशेतीला मोठा फटका बसला. त्यामुळे फुलांचा माल शेतातच खराब झाला. जे काही चांगली फुलं होती ते बाजारात आले. मात्र पावसामुळे पुन्हा फुलांचा माल सडला (Florists throw flowers at Kalyan APMC).

कोरोना संकटामुळे मंदिरं उघडी झालेली नाहीत. सध्या मंदीरं सजविण्यासाठी भक्त फुलं विकत घेत नाहीत. त्यामुळे बाजारात फुलाला उठाव नाही. जो काही थोडाफार घरगुती हारासाठी हार फूल नेले जात होते, त्यालाही परतीच्या पावसाने फटका बसला आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (19 ऑक्टोबर) फुल मालांच्या 25 गाड्या आल्या. मात्र मालाला उठाव नाही. तसेच पावसामुळे माल भिजल्याने फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ विक्रेत्यांना आली आहे. जवळपास 10 हजार किलो फूलं रस्त्यावर फेकून देण्यात आली आहे. त्यामुळे फूल व्यापाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.

हेही वाचा : सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे आवक वाढल्याने दरात स्थिरता