मोगली धरण नवी मुंबई मनपाकडे हस्तांतरित करा; गणेश नाईक यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Dec 07, 2020 | 12:20 PM

रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे दिघा इलठणपाडा येथील मोगली धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली.

मोगली धरण नवी मुंबई मनपाकडे हस्तांतरित करा; गणेश नाईक यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

 

नवी मुंबई : रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे दिघा इलठणपाडा येथील मोगली धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. हे ब्रिटीशकालीन धरण महापालिकेकडे हस्तांतरित केल्याने पाण्याचा एक अतिरिक्त स्त्रोत मनपा प्रशासनाकडे तयार होईल, असे नाईक यांनी सांगितले. नाईक यांनी पियुष गोयल यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. (Ganesh Naik demands that Transfer Mowgli Dam to Navi Mumbai Corporation)

माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात मोगली धरण महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या पाहता दिघा आणि खैरणे-बोनकोडे ही दोन रेल्वे स्थानके रेल्वे प्रशासनाकडून मंजूर करुन घेतली होती.

त्यानंतर गणेश नाईक यांच्या कार्यकाळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मोरबे धरण विकत घेण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नवी मुंबई शहर स्वयंपूर्ण झाले. त्यानंतर, ‘मोगली धरण महानगरपालिकडे हस्तांतरित करुन घेतल्यास अतिरिक्त पाण्याचा एक स्त्रोत महापालिकेकडे तयार होईल. त्याचबरोबर याठिकाणी पर्यटनस्थळदेखील विकसित करता येईल’, अशी भूमिका गणेश नाईक यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडली.

ऐरोली विधानसभा मतदार संघाचे तत्कालिन आमदार संदीप नाईक यांनीदेखील 31 ऑगस्ट 2018 रोजी मोगली धरण नवी मुंबई पालिककडे दिर्घकालीन भाडेपट्ट्यावर हस्तांतरित करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री गोयल यांनी रेल्वेचे तत्कालिन डीआरएम आणि संबंधित अधिकार्‍यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गणेश नाईक यांनीदेखील मोगली धरण हस्तांतरण करण्याची मागणी केली आहे. त्यावर सकारात्मक भूमिका घेत रेल्वे मंत्र्यांनी हे धरण लवकरात लवकर नवी मुंबई महानगरपालिकडे हस्तांतरण करण्याच्या तोंडी सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

दिघा रेल्वेस्थानकाच्या कामास गती द्यावी

‘दिघा रेल्वे स्थानकाचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु या कामाची संथ गती पाहता निश्चित कालावधीमध्ये हे स्थानक पूर्ण होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे या स्थानकाच्या कामास गती द्यावी,’ अशी मागणी नाईक यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.

खैरणे-बोनकोडे स्थानकाचे काम सुरु करावे

‘दिघा स्थानकासोबत खैरणे-बोनकोडे स्थानक मंजूर करण्यात आले होते. मात्र या स्थानकाच्या कामास अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिघा स्थानकाबरोबरच खैरणे-बोनकोडे स्थानकाचे कामही हाती घेण्यात यावी,’ अशी मागणी नाईक यांनी केली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी रेल्वेमंत्र्यांनी दिले आहे. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते. (Ganesh Naik demands that Transfer Mowgli Dam to Navi Mumbai Corporation)

संबंधित बातम्या :

चोरीच्या घटनेतील सराईत आरोपीला अटक, नवी मुंबई पोलिसांना मोठं यश

रेल्वेस्थानके, बस आगार, रिक्षा स्टॉपवर होणार कोरोना चाचणी, नवी मुंबई महापालिका सतर्क

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त; नवी मुंबईच्या मार्केटमध्ये माथाडी कामगारांचा संप