खालापूर तहसिलदार गोदरेज कंपनीच्या दबावाखाली? अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची स्थळपहाणी अचानक रद्द

| Updated on: Aug 21, 2019 | 9:38 AM

मुंबईजवळ असलेला रायगड जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प होत आहेत. नवे आंतरराष्ट्रीय विमानतळही रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे होत आहे. उरण आणि पनवेल तालुक्यात सिडकोने कायापालट केला आहे. मोठमोठे शासकीय आणि खासगी प्रकल्पही रायगडमध्येच होत आहेत. मात्र, यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र आहे.

खालापूर तहसिलदार गोदरेज कंपनीच्या दबावाखाली? अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची स्थळपहाणी अचानक रद्द
Follow us on

रायगड : मुंबईजवळ असलेला रायगड जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प होत आहेत. नवे आंतरराष्ट्रीय विमानतळही रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे होत आहे. उरण आणि पनवेल तालुक्यात सिडकोने कायापालट केला आहे. मोठमोठे शासकीय आणि खासगी प्रकल्पही रायगडमध्येच होत आहेत. मात्र, यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र आहे.

‘गोदरेज अँड बायस’ (Godrej & Boyce) कंपनीच्या विक्रोळी येथील प्रकल्पाचे खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपचांयतमध्ये विस्थापन झाले आहे. कंपनीने तांबाटी येथे काही बंद पडलेल्या कंपन्यांची जमीन विकत घेतली आहे. तसेच काही ठिकाणी बिगर शेती जमीन देखील ताब्यात घेतल्या आहेत. परंतु हे सर्व करताना गोदरेज व्यवस्थापनाने इतर शेतकऱ्यांच्या जमिनीकडे जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे काही शेतकऱ्यांना यावर्षी शेतीच करता आली नाही. त्यानंतर पीडित शेतकऱ्यांनी खालापूर तहसिलदारांकडे वहिवाटीसाठी तक्रार दाखल केली.

संबंधित तक्रारीनंतर मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी प्रत्यक्ष स्थळपहाणी करुन तसा अहवाल शासनास सादर केला. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या शेतीपासून वंचित ठेवणाऱ्या गोदरेज व्यवस्थापनाने तहसिलदार प्रशासनाकडे दाद न मागता दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्याचे समोर येत आहे.

एकीकडे शेतकरी प्रशासनाकडे वहिवाटीची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे गोदरेजने वहिवाट अहवाल आणि शेतकऱ्यांविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्यामुळे येथील शेतकरी कायदेशीर कात्रीत सापडले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या वहिवाट आणि शेतीची पहाणी करण्यासाठी खालापूर तहसिल कार्यालयाने 20 ऑगस्ट रोजी संबंधित शेतकऱ्यांना स्थळ पहाणीसाठी तहसिलदार प्रत्यक्ष जागेवर येणार असून उपस्थित राहण्यासंदंर्भात नोटीस बजावली. शेतकरी मंगळवारी (20 ऑगस्ट) सकाळपासून गोदरेज कपंनीच्या गेटवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांची उपस्थिती पाहून गोदरेज व्यवस्थापनाचे काही अधिकारी आणि वकिलांनी थेट तहसिल कार्यालय गाठले. त्यांनी तहसिलदार ईरेश चप्पलवार यांच्याशी चर्चा केली. काही वेळाने तहसिलदार चप्पलवार यांनी तांबाटी ग्रामपचांयतचे सरपंच अनिल जाधव यांना फोन करून कार्यालयात काम असल्याने स्थळ पाहणी भेट रद्द करत असल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या दिवशी 21 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनाच घेऊन तहसिल कार्यालयात येण्यास सांगितले. या सदंर्भात गोदरेज यवस्थापनाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु यवस्थापनाने भेट नाकारली. तहसिलदार चप्पलवार यांनाही याबाबत संपर्क साधला, परंतु कामात व्यस्त असल्याने ते देखील भेटू शकले नाही.

शेतीपासून वंचित झालेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांवर गोदरेज व्यवस्थापनाने अप्रत्यक्षपणे शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणला. यातून ते शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव रचत असल्याची भावना पीडित शेतकरी व्यक्त करत आहेत. कंपनी व्यवस्थापनाच्या सौहादपूर्ण भेटीला तहसिलदार चप्पलवार बळी पडले का? अशीही चर्चा खालापुरात रंगली आहे.