कॉलेजच्या परीक्षा रद्द, थेट पुढच्या वर्षात प्रवेश, अंतिम सत्राची परीक्षा मात्र होणार, उच्च शिक्षणमंत्र्यांची घोषणा

| Updated on: May 08, 2020 | 3:13 PM

राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा एक ते 31 जुलै दरम्यान होतील. मात्र लॉकडाऊनची स्थिती कायम राहिल्यास 20 जूनच्या आसपास निर्णय होईल (Uday Samant on Maharashtra College Exams)

कॉलेजच्या परीक्षा रद्द, थेट पुढच्या वर्षात प्रवेश, अंतिम सत्राची परीक्षा मात्र होणार, उच्च शिक्षणमंत्र्यांची घोषणा
Follow us on

मुंबई : पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या घोषणेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Uday Samant on Maharashtra College Exams)

पदवीच्या केवळ अंतिम वर्षांचीच परीक्षा होणार आहे असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. बाकी सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून नवीन वर्गात प्रवेश मिळणार आहे. मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आधी कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याचीही मुभा देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशांनुसार सर्व निर्णय घेण्यात येत असल्याचंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा एक ते 31 जुलै दरम्यान होतील. मात्र लॉकडाऊनची स्थिती कायम राहिल्यास 20 जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालय बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांना याआधीच पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे. मात्र कॉलेज विद्यार्थ्यांवर टांगती तलवार होती.

हेही वाचा : महाविद्यालयाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार? उदय सामंत यांच्याकडून महत्वाची माहिती

बीए, बीकॉम हे तीन वर्षांच्या कालावधीचे अभ्यासक्रम आहेत. त्यात सहा सत्र असतात. या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा फक्त होणार आहे. जिथे 8 सेमिस्टर आहेत, तिथे आठव्या, दहा सेमिस्टर असतील, तिथे दहाव्या सेमिस्टरची परीक्षा घेतली जाणार आहे. (Uday Samant on Maharashtra College Exams)

एमए, एमकॉम आणि दोन वर्षांचे जे अभ्यासक्रम आहेत, त्याला चार सेमिस्टर आहेत. तिथे चौथ्या सेमिस्टरची परीक्षा होणार आहे. डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा, म्हणजे सहा सेमिस्टरचा आहे. त्याच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा होईल, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.