कल्याण : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या (Wife Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याणमधील (Kalyan) उंबर्डे परिसरातील वसंत चाळीत घडली. रेखा असं मृत महिलेचं नाव आहे. आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कल्याण येथील वसंत चाळीत आरोपी पती विक्रम कुमार आणि मृत पत्नी रेखा राहत होते. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. विक्रम घरी नसताना एक तरुण त्याच्या पत्नीला भेटायला घरी यायचा. हे विक्रमला समजले होते. त्यामुळे तो पत्नीवर सतत संशय घेत होता.
पत्नी रेखाचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहे, असा संशय असल्याने त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता. 30 ऑगस्ट रोजी विक्रमने गावी जाण्यासाठी ट्रेनची तिकिट बुक केली होती. पण पत्नी रेखा गावी जायला तयार नव्हती, यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाली होती. या भांडणातून विक्रमने पत्नीचे हात-पाय बांधून तिचा गळा चिरुन खून केला, असं पोलिसांनी सांगितले.
खडकपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत विक्रमचा शोध घेत आहेत. विक्रमला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत या हत्येचं मूळ कारण काय आहे ते स्पष्ट होणार नाही, असं पोलीस म्हणाले.