शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आयुष्यातलं शेवटचं आंदोलन करेन; अण्णा हजारेंचा केंद्राला इशारा

| Updated on: Dec 28, 2020 | 4:49 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आयुष्यातलं शेवटचं आंदोलन करेन; अण्णा हजारेंचा केंद्राला इशारा
Anna hazare
Follow us on

अहमदनगर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत गेल्या महिनाभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. (If farmers demands will not accepted then I will do last protest of my life; Anna Hazare’s warning to the Center)

अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे (Ralegan Siddhi Village) अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलत असताना केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. अण्णा यावेळी म्हणाले की, “शेतकऱ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन करत आहे, परंतु सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. हे सरकार केवळ पोकळ आश्वासनं देत आहे. त्यामुळे माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही”.

अण्णा हजारे म्हणाले की, “सरकार माझ्या मागण्यांचा विचार करतंय का? त्यादृष्टीने काही पावलं उचलतंय का ते आपण पाहुया. त्यांनी एक महिन्याचा अवधी मागितला आहे. त्यामुळे मी त्यांना जानेवारी महिन्याची मुदत दिली आहे. जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मी आमरण उपोषणाला बसेन. हे माझं शेवटचं आंदोलन असेल”.

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांसोबत चर्चा करून एक महिन्याची मुदत मागून अण्णांनी आंदोलन करू नये अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. मात्र आता अण्णांनी अश्वासनांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटी आयुष्यातील शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आता केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कृषी कायद्यांबाबत अण्णा हजारे समाधानी?

कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आणि कायदे मागे घेण्याबाबत अण्णा हजारे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. केवळ कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतीलच असे नसून, दिल्लीतील आंदोलन हे सिमीत आहे, असे मत त्यांनी नुकतेच व्यक्त केले होते.

मात्र, अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या इतर समस्यांसाठी आंदोलन छेडल्यास भाजपची राजकीय कोंडी होऊ शकते. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर उपोषण केले होते. या आंदोलनाला देशव्यापी प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे काँग्रेस सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. ही शक्यता लक्षात घेता भाजप यावेळी अण्णा हजारे यांच्याबाबत कोणताही धोका पत्कारण्यास तयार नाही.

हेही वाचा :

‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं

(If farmers demands will not accepted then I will do last protest of my life; Anna Hazare’s warning to the Center)