मुंबईत सामूहिक बलात्कार झालेल्या जालन्याच्या तरुणीचा अखेर मृत्यू

| Updated on: Aug 28, 2019 | 10:36 PM

मुंबईत आपल्या भावाकडे आलेल्या या तरुणीवर चार जणांनी गुंगीचं औषध देऊन बलात्कार (Jalna Girl gang rape) केला होता. यानंतर या तरुणीला उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आलं. 7 जुलैला बलात्कार (Jalna Girl gang rape) झाल्यानंतर अखेर पावणे दोन महिन्यांनंतर या मुलीला प्राण गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे आरोपी अजूनही मोकाट आहेत.

मुंबईत सामूहिक बलात्कार झालेल्या जालन्याच्या तरुणीचा अखेर मृत्यू
Follow us on

औरंगाबाद : चार नराधमांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या जालन्यातील तरुणीची मृत्यूशी झुंज अखेर संपली. सामूहिक बलात्कारानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या जालन्यातील तरुणीने औरंगाबादमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुंबईत आपल्या भावाकडे आलेल्या या तरुणीवर चार जणांनी गुंगीचं औषध देऊन बलात्कार (Jalna Girl gang rape) केला होता. यानंतर या तरुणीला उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आलं. 7 जुलैला बलात्कार (Jalna Girl gang rape) झाल्यानंतर अखेर पावणे दोन महिन्यांनंतर या मुलीला प्राण गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे आरोपी अजूनही मोकाट आहेत.

काही दिवसांपूर्वी आपल्या भावाला भेटायला मुंबईत आलेल्या या मुलीवर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केला. ही तरुणी मरणप्राय यातना भोगत होती. चार जणांनी केलेल्या पाशवी बलात्कारानंतर या मुलीचा कमरेपासून खालचा भाग पूर्णतः निकामी झाला. तिला सातत्याने वेडाचे झटके येत होते. ती शुद्धीवर आल्यानंतर जोरजोरात ओरडत होती. अत्यंत अमानवी पद्धतीने अत्याचार या मुलीवर करण्यात आले.

पीडित मुलगी ही मूळची जालना जिल्ह्याची रहिवासी आहे. पीडित महिलेचा भाऊ हा मुंबईतल्या चेंबूर परिसरात राहत होता. भावाच्या मुलाला सांभाळण्यासाठी ती मुंबईत आली होती. 7 जुलैला भावाच्या मुलाला ताप आला म्हणून त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यादिवशी पीडित मुलगी घरी एकटीच होती. यावेळी तिला कुणीतरी फोन करून बाहेर बोलावून घेतलं आणि गुंगीचं औषध देऊन चार जणांनी बलात्कार केला.

घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार घडल्यानंतर घरी काहीच सांगितलं नाही. वेदना सहन करत ती तशीच झोपून राहिली. दोन दिवसानंतर तिचे पाय लुळे पडू लागले. त्यानंतर घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी हा प्रकार अर्धांगवायूचा नसून वेगळं काहीतरी असल्याने तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. तेव्हा मुलीच्या वडिलांनी मुलीला औरंगबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केलं. पण इथल्या डॉक्टरांनी तपासणी करून मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं.

त्यानंतर पीडितेने चार जणांनी काहीतरी पाजून आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं. मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. हाच गुन्हा मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांनाही अजून आरोपी शोधण्यात यश आलेलं नाही. मरणयातना भोगून या तरुणीने अखेर जगाचा निरोप घेतला. पण या चार नराधमांना शोधण्यात अजूनही पोलीस अपयशी ठरले आहेत.