Kulbhushan Jadhav Verdict : पाकिस्तानला तोंडावर पाडणारं Article 36 काय आहे?

| Updated on: Jul 17, 2019 | 7:28 PM

पाकिस्तानच्या कोठडीत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी आणि महाराष्ट्राचा सुपुत्र कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे.

Kulbhushan Jadhav Verdict : पाकिस्तानला तोंडावर पाडणारं Article 36 काय आहे?
Follow us on

हेग (नेदरलँड) : पाकिस्तानच्या कोठडीत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी आणि महाराष्ट्राचा सुपुत्र कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीची शिक्षा आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगित केली. शिवाय कौन्सिलर अक्सेस म्हणजेच वकिलातीचा मार्ग मोकळा करुन दिला.

याआधी दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला अंतिम सुनावणीपर्यंत स्थगिती दिली. आज याप्रकरणी अंतिम सुनावणी झाली. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा मोठा विजय भारताने मिळवला.

कोर्टाने निकाल देताना व्हिएन्ना कराराची जाणीव करुन दिली. व्हिएन्ना करारातील कलम 18 ने पाकिस्तानला तोंडावर पाडलं.

काय आहे व्हिएन्ना करार?

दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात अस्वस्था पसरली होती. त्यावेळी सर्व देशांना परस्परांमध्ये सौहार्द राखण्यासाठी एका समान धाग्यात, समान नियमात बांधण्याची गरज सर्वांना वाटली. त्यातूनच व्हिएन्ना करार उदयाला आला. या कराराने एकमेकांशी सौहार्दाचे संबंध राखण्यासाठी राजनैतिक किंवा राजदूतांना विशेष अधिकार देण्यावर एकमत झालं.

या करारानुसार एका देशाचे राजदूत दुसऱ्या देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि भीतीशिवाय काम करु शकतात. याअंतर्गत राजदुतांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत.

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये 18 एप्रिल 1961 रोजी आंतरराष्ट्रीय कायदेमंडळाने व्हिएन्ना करार प्रत्यक्षात आणला. तोच करारा व्हिएन्ना करार म्हणून जगातील 189 देशांनी त्यावेळी स्वीकारला. यातील तरतुदी कायद्याच्या स्वरुपात 1972 मध्ये आल्या.

व्हिएन्ना करारातील तरतुदी

  • निर्मितीवेळी व्हिएन्ना करारात एकूण 52 कलमांचा समावेश करण्यात आला.
  • विविध देशांत आपला प्रतिनिधी अर्थात राजदूत नेमण्याच्या दृष्टीने व्हिएन्ना करार महत्त्वाचा आहे
  • दुसऱ्या देशात राजदूताच्या संमतीशिवाय दुतावासात त्रयस्थ व्यक्तीला जाता येत नाही.
  • राजदूताला अटक, झडती घेणे, कर लावणे यासारख्या सर्व कारवायांना मनाई आहे
  • दुतावासाबाहेर हल्ले, बॉम्बस्फोट होणे म्हणजे संबंधित राष्ट्रासाठी अपमानजनक कृत्य
  • नागरिकांना राजनैतिक अधिकार देणे

आंतरराष्ट्रीय कोर्टाने उल्लेख केलेला कलम 36

व्हिएन्ना करारात (Vienna Convention on Consular Relations) कलम 36 (Article 36 ) हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यानुसारच आज कुलभूषण जाधव प्रकरणात भारताचा 15 विरुद्ध 1 असा मोठा विजय झाला.

कलम 36 नुसार, व्हिएन्ना करार स्वीकारलेल्या सर्व देशांना एखाद्या देशाने दुसऱ्या देशाचा नागरिक पकडला किंवा त्याला अटक केली, तर अटकेतील व्यक्तीला संबंधित देशाचा राजनैतिक अधिकार अर्थात (consular access) देणे. शिवाय अटकेतील नागरिकाच्या देशालाही राजनैतिक अधिकाराचा मार्ग खुला करणे.

म्हणजेच कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील भारतीय दुतावासाचा राजनैतिक अधिकार पाकिस्तानने देणे बंधनकारक असेल. हीच मागणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली होती, जी सहज मान्य झाली.

आता पुढे काय होईल?

आंतरराष्ट्रीय कोर्टाने भारताची मागणी मान्य केल्याने, आता हा खटला पाकिस्तानात पुन्हा नव्याने सुरु होईल. तिथे कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळेल. या मदतीमुळे भारत पाकिस्तानच्या कोर्टात आपली बाजू मांडेल. याआधी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा खटला त्यांच्या मिलिट्री कोर्टात चालवला होता.