स्थलांतरित मजुरांना दिलासा, तेलंगणा ते झारखंड विशेष ट्रेन धावली

| Updated on: May 01, 2020 | 3:55 PM

तेलंगणा राज्यात अडकलेल्या झारखंडच्या स्थलांतरीत मजुरांसाठी (Telangana to Jharkhand special train) रेल्वे मंत्रालयाने आज विशेष ट्रेन चालवली.

स्थलांतरित मजुरांना दिलासा, तेलंगणा ते झारखंड विशेष ट्रेन धावली
Follow us on

हैदराबाद : तेलंगणा राज्यात अडकलेल्या झारखंडच्या स्थलांतरीत मजुरांसाठी (Telangana to Jharkhand special train) रेल्वे मंत्रालयाने आज विशेष ट्रेन चालवली. ही ट्रेन आज सकाळी 5 वाजता तेलंगणाच्या लिंगमपेल्ली रेल्वे स्थानकावरुन सुटली. ही विशेष ट्रेन आज (1 मे) रात्री 11 वाजेच्या सुमारास झारखंडच्या हतिया रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या विशेष ट्रेनमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईन्सचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत (Telangana to Jharkhand special train).

लॉकडाऊनदरम्यान लाखो स्थलांतरित मजूर आणि विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. या सर्वांनी घरी जाता यावं यासाठी सरकारकडे विनंती केली आहे. त्यामुळे अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि मजुरांना परत आपापल्या राज्यात घेऊन जाण्यासंदर्भात परवानगी दिली. मात्र, मजूर आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडाईन्समध्ये मजूर किंवा विद्यार्थ्यांना रस्ते मार्गाने आपापल्या राज्यात घेऊन जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, देशातील सात राज्यांनी केंद्र सरकारकडे विशेष ट्रेन चालवण्याची विनंती केली आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह पंजाब, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, बिहार, झारखंड आणि तमिळनाडू सरकार यांचा समावेश आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यात 9 लाख स्थलांतरित मजूर असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांना दिली. विद्यार्थी आणि मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी विशेष ट्रेनचीच आवश्यकता आहे, असे सोरेन यांनी पीयूष गोयल यांना सांगितलं होतं.

तेलंगनाचे मंत्री टी श्रीनिवास यांनीदेखील रेल्वे मंत्रालयाकडे विशेष ट्रेनची मागणी केली होती. “बसमार्फत मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवणं अशक्य आहे. यासाठी ट्रेनच चालवण्यात यावी”, असं श्रीनिवास म्हणाले होते. त्यामुळे अखेर रेल्वे मंत्रालयाने विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला

“राज्य सरकारांच्या विनंतीवरुन ही विशेष ट्रेन चालवण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात आलं आहे”, असं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातही लाखो स्थलांतरित मजूर अडकले आहेत. यापैकी 10 लाख मजुरांना घरची आस लागली आहे. हे सर्व मजूर बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड इत्यादी राज्यांचे नागरिक आहेत. दरम्यान, इतर राज्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलली आहेत. राजस्थानच्या कोटा येथे अडकलेले बरेच विद्यार्थी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

संबंधित बातमी :

आंध्र-तेलंगणात अडकलेल्या 26 हजार मजुरांना परत आणणार : विजय वडेट्टीवार