लॉकडाऊन काळात 50 हजार गुन्हे दाखल, 1 कोटींचा दंड वसूल, 10 हजार जणांना अटक

| Updated on: Apr 18, 2020 | 12:06 AM

राज्यात लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च 17 एप्रिल या कालावधीत (Maharashtra Lockdown violation) कलम 188 नुसार 49 हजार 756 गुन्हे दाखल झाले आहेत.

लॉकडाऊन काळात 50 हजार गुन्हे दाखल, 1 कोटींचा दंड वसूल, 10 हजार जणांना अटक
Follow us on

मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च 17 एप्रिल या कालावधीत (Maharashtra Lockdown violation) कलम 188 नुसार 49 हजार 756 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 10 हजार 276 व्यक्तींना अटक करण्यात आली असून जवळपास 32 हजार 424 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबरवर 70 हजार 307 फोन (Maharashtra Lockdown violation) आले. या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का आहे, अशा 555 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.

या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1 कोटी 82 लाख 76 हजार 744 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

7 अधिकारी आणि 23 पोलिसांना बाधा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने सात पोलीस अधिकारी आणि 23 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 102 घटनांची नोंद झाली असून यात 162 आरोपींना अटक करण्यात (Maharashtra Lockdown violation) आली आहे.