आठवडाभरात 14 लाख जमवले, महिला बचत गटांकडून पूरग्रस्तांसाठी मदत
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटातील महिलांनी एका आठवड्यात 14 लाख 21 हजार रुपयांची रक्कम गोळा केली आहे. महिला बचत गटातील महिलांसह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही यासाठी मदत दिली आहे.
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) मार्फत (Mahila Arthik Vikas Mahamandal) स्थापन झालेल्या महिला बचत गटांतील (Mahila Bachat Gat) महिलांनी स्वकमाईतील पैशांची बचत करुन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना (Kolhapur Sangli Flood) तब्बल 14 लाख 21 हजार 228 रुपयांची मदत केली आहे. हा निधी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज (28 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला जाणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी उद्भवलेल्या भीषण पूरस्थितीमुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या ठिकाणच्या नागरिकांसाठी विविध सामाजिक संघटना, राज्य शासन, स्वयंसेवी संस्थेद्वारे मदत दिली जात असून महिला बचत गटांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटातील महिलांनी एका आठवड्यात 14 लाख 21 हजार रुपयांची रक्कम गोळा केली आहे. महिला बचत गटातील महिलांसह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही यासाठी मदत दिली आहे. विशेष म्हणजे यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांकडून कोणत्याही प्रकारचा निधी गोळा करण्यात आलेला नाही.
बचत गटातील महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी सहयोगिनी, व्यवस्थापक, लेखापाल, समन्वयक यांच्यासह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना योगदान देत पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनीही आपले एक महिन्याचे मानधन कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांसाठी दिले आहे.
यासोबतच महिला आर्थिक विकास महामंडळाने ओएनजीसी सोबत 9 लाख रुपयांचे साहित्य पाठवले. यामध्ये चार हजार किलो तांदूळ, चार हजार किलो पीठ, दोन हजार किलो तूर दाळ यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय मसाला, हळद इत्यादी गोष्टी पुरवल्या गेल्या आहेत. हे सर्व साहित्य दोन ट्रकद्वारे गरजुंना पुरवण्यात येणार आहे.